शेतकर्यांना अनुदानावर ७५ टक्के बियाणे देण्याची मागणी
By Admin | Updated: June 17, 2014 20:12 IST2014-06-17T19:49:42+5:302014-06-17T20:12:28+5:30
अतिवृष्टीमुळे खरिपाचे उत्पादन आणि दर्जा खालावल्याने यंदा बियाण्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली

शेतकर्यांना अनुदानावर ७५ टक्के बियाणे देण्याची मागणी
मूर्तिजापूर : गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे उत्पादन आणि दर्जा खालावल्याने यंदा बियाण्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून, आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्यांना अनुदानावर ७५ टक्के बियाणे देण्याची मागणी करण्यात येत आहे.
पावसाळा सुरू झाला असला तरी, मान्सूनच्या पावसाने राज्यातील काही जिल्ह्यांत अद्यापही हजेरी लावली नसल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. शेतकर्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली असून, पेरणीसाठी त्यांना मान्सूनच्या चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे; मात्र बियाण्यांच्या किमती दुपटीने वाढल्यामुळे शेतकर्यांसमोर नवेच संकट उभे राहिले आहे.
गतवर्षीची अतिवृष्टी आणि यंदा फे ब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे खरीप आणि रब्बी पिकांची ऐशीतैशी झाल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. नेहमीच आशेवर जगणार्या बळीराजाने धीर न सोडता कसेबसे करीत पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली; परंतु गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांच्या उत्पादनासह दर्जाही खालावला. दुसरीकडे बियाण्यांच्या किमतीत दुप्पट वाढ झाली, तर उत्पादन घटल्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकर्यांनी जवळचा सर्व माल विकला. त्यामुळे त्यांच्याकडे पेरणीसाठी बियाणेही उरले नाही. भरीसभर दर्जा खालावल्यामुळे शेतकर्यांनी स्वत:जवळचे सोयाबीन बियाणे वापरताना त्याची उगवण क्षमता तपासावी, असा सल्लाही कृषी विभागाकडून देण्यात येत असून, एकीकडे बियाण्यांच्या वाढलेल्या किमती, तर स्वत:जवळ असलेल्या बियाण्यांची घटलेली उगवण क्षमता, अशा दोन समस्येत शेतकरी सापडला आहे. म्हणूनच शासनाने शेतकर्यांना अनुदान तत्त्वावर यंदा ७५ टक्के बियाण्यांचे वाटप करावे, तसेच विशेष घटक योजनेंतर्गत सिंचन विहिरीसाठी मिळणार्या एक लक्ष रुपयांच्या अनुदानातही वाढ करून ते तीन लक्ष करावे, अशी मागणी प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष आणि जांभा खुर्दचे माजी सरपंच राजू साहेबराव वानखडे आणि तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.