CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; ३७ नवे पॉझिटिव्ह, १६ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 18:15 IST2020-08-26T18:15:29+5:302020-08-26T18:15:40+5:30
बोरगाव मंजु व पोपटखेड येथील दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४६ वर पोहचला आहे.

CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; ३७ नवे पॉझिटिव्ह, १६ जण कोरोनामुक्त
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराला बळी पडणाऱ्यांची व संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच आहे. बुधवार, २६ आॅगस्ट रोजी बोरगाव मंजु व पोपटखेड येथील दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १४६ वर पोहचला आहे. दिवसभरात आणखी ३७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३,६२५ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे १७१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, १३४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ३७ जणांमध्ये १४ महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये एकट्या मुर्तीजापूर शहरातील ३१ जणांचा समावेश असून, उर्वरित सहा जणांंमध्ये पातूर तालुक्यातील चरणगाव येथील दोन, तेल्हारा येथील दोन, तर कृषी नगर व आसेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
बोरगाव मंजू , पोपटखेड येथील दोघे दगावले
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाºयांची वाढती संख्या चिंताजनक आहे. बोरगाव मंजू येथील ८७ वर्षीय पुरुषाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २३ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. अकोट तालुक्यातील पोपटखेड येथील ८६ वर्षीय पुरुषाचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांना २२ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.
१६ जणांना डिस्चार्ज
एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्याही वाढत आहे. बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४०९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,६२५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३०७० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४०९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.