देयके थकली; कंत्राटदार आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 14:20 IST2017-08-16T14:20:19+5:302017-08-16T14:20:19+5:30

देयके थकली; कंत्राटदार आंदोलनाच्या पवित्र्यात
अकोला: महावितरण कंपनीसाठी केलेल्या कामांच्या देयकांची रक्कम गत चार महिन्यांपासून मिळाली नसल्याने हतबल झालेल्या कंत्राटदारांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कामाचे पैसे मिळाले नाही, तर महावितरणचे कोणतेही नवीन अथवा जुनी दुरुस्तीची कामे करणार नसल्याचा इशारा कंत्राटदार संघटनेने दिला आहे.
अमरावती, बुलडाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ या ५ जिल्ह्यातील सर्व विद्युत कंत्राटदारांची सभा शनिवार, १३ आॅगस्ट रोजी अमरावती येथे झाली. या बैठकीत देयके न मिळाल्यास कंपनीचे काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकºयांना ओलिताची शेती करता यावी यासाठी शासनाने महावितरणला निविदा काढून कामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कंपनीने कंत्राटदारांना कामे देऊन कृषी पंपांना वीज जोडणीचा अनुशेष भरून काढण्याच्या सूचना दिल्या. कंत्राटदारांनी कामे केल्यानंतर त्यांची बिले काढणे अपेक्षित होते; परंतु मार्च २०१७ पासून कंत्राटदारांना देयकाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्रस्त झालेल्या कंत्राटदारांनी केलेल्या कामांची देयके अदा झाल्याशिवाय काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.