हवामान बदलाचा पिकांना बसणार फटका!

By Admin | Updated: January 1, 2015 00:30 IST2015-01-01T00:30:59+5:302015-01-01T00:30:59+5:30

हलका पाऊस, किमान तापमानात वाढ, तूर, हरभरा, फळ पिकांना धोका.

Climate change crops fall! | हवामान बदलाचा पिकांना बसणार फटका!

हवामान बदलाचा पिकांना बसणार फटका!

अकोला : विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले असून, काही ठिकाणी हलक्या स्वरू पाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या वातावरणाचा फटका मात्र तूर, हरभरा या रब्बी पिकांना बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे. दरम्यान, या वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे.
२0१४ मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने खरीप पिके हातची गेली आणि रब्बी पिकांवरही परिणाम झाला आहे. अकोला जिल्हय़ात तर ३0 ते ४0 टक्के शेतकर्‍यांनीच रब्बी पिकांची पेरणी केली आहे. यामध्ये हरभरा पीक सर्वाधिक आहे. तथापि जमिनीतील ओलावा संपल्याने अनेक ठिकाणी हे पीक उलटले आहे. जेथे हरभरा आला त्याची वाढ खुंटली आहे.अशावेळी अवकाळी पावसाचे ढग तयार झाल्याने, या पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, थंडी वाढल्यास त्याचा फटका या पिकांना बसू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. तर ज्या शेतकर्‍यांनी ऑक्टोबर महिन्यात गहू पेरणी केली आहे. हे गव्हाचे पीक परिपक्वता म्हणजेच ओंबीवर आले आहे. या गव्हाला अवकाळी पावसाचा फटाक बसण्याची शक्यता आहे.
करडई तेलबिया पिकाची काही ठिकाणी पेरणी केली आहे. या पिकांना ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता असून, भाजीपाला, फळ पिके,आंब्याचा मोहोर गळून पडण्याची शक्यता आहे. सध्या तूर पीक शेतात आहे. या ढगाळ वातावरणामुळे या पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कापूस शेतात असेल तर या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असली तरी जेथे कापूस काढून झाला तेथील कापसाला या पावसामुळे नवी फरदड येईल.
अवकाळी पाऊस दोन-चार दिवस सुरू राहिला तर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाल यांनी वर्तवली.

Web Title: Climate change crops fall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.