मुलांनी उचलले पर्यावरणपुरक गणेश उत्सवाचे शिवधनुष्य

By Admin | Updated: August 27, 2015 00:52 IST2015-08-27T00:52:42+5:302015-08-27T00:52:42+5:30

शाडू मातीच्या गणेश मूर्तीची घरांमध्ये करणार प्रतिष्ठापना.

The children lifted the eco-friendly Ganesh festival | मुलांनी उचलले पर्यावरणपुरक गणेश उत्सवाचे शिवधनुष्य

मुलांनी उचलले पर्यावरणपुरक गणेश उत्सवाचे शिवधनुष्य

अकोला : दरवर्षी कोट्यवधी प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तींंपासून होणार्‍या जलप्रदूषणामुळे जीवघेणे आजार होतात. त्यामुळे याला आळा घालून जलप्रदूषण रोखण्याचा शिवधनुष्य येथील निसर्गकट्टा या स्वयंसेवी संस्थेच्या मुलांनी उचलला असून, मातीपासून हजारो गणेश मूर्ती बनविण्यात येत आहेत. राज्याची लोकसंख्या नऊ कोटी असून, जवळपास १ कोटी घरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींंची प्रतिष्ठापना करण्यात येते. या मूर्ती विहीर, नदी, तलाव, समुद्रात शिरविण्यात येतात. मूर्तींंना देण्यात येणार्‍या रासायनिक रंगात लिड, मक्यरूरीसारखे घातक रसायने असतात. यापासून कर्करोग, त्वचारोगासारखे आजार होतात. यामुळे धार्मिक उत्सवाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. हे रोखण्याकरिता येथील निसर्गकट्टा ही स्वयंसेवी संस्था प्रयत्न करीत आहे. २00४ साली निसर्गकट्टाचे संस्थापक व शिक्षक असलेले हरीश शर्मा यांनी त्यांच्याच शाळेतील विद्यार्थ्यांंच्या माध्यमातून हा प्रयोग सुरू केला. मुलांना शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थी स्वत: मातीच्या मूर्ती तयार करतात, मूर्तींंना नैसर्गिक रंग दिल्या जातो व घरात स्थापना करण्यात येते. निसर्गकट्टाच्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या एक महिन्यापूर्वीपासूनच तयारी करण्यात येते. विद्यार्थ्यांंना मातीच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. सुरुवातीला काही प्रशिक्षकही नेमण्यात आले होते. आता विद्यार्थीच प्रशिक्षण देतात. शाळा शाळांमध्ये किंवा शहरातील बाग, अशा विविध ठिकाणी विद्यार्थी शाडूची माती खरेदी करून मूर्ती तयार करतात. त्यानंतर घरामध्ये याच मूर्तींची प्रतिष्ठापना करतात.

Web Title: The children lifted the eco-friendly Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.