अर्थसंकल्पाने केली वाशिम जिल्ह्याची निराशा

By Admin | Updated: March 19, 2016 01:14 IST2016-03-19T01:14:35+5:302016-03-19T01:14:35+5:30

केवळ उड्डाणपुलासाठी मिळाले २0.५0 कोटी.

The budget is disappointing in the Washim district | अर्थसंकल्पाने केली वाशिम जिल्ह्याची निराशा

अर्थसंकल्पाने केली वाशिम जिल्ह्याची निराशा

वाशिम : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, शुक्रवारी अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, जिल्हावासीयांच्या नशिबी उपेक्षाच आली. उड्डाणपुलासाठी २0.५0 कोटी मिळाले असून, या व्यतिरिक्त जिल्ह्याच्या मागण्यांना ठेंगा दाखविण्यात आला.
सततच्या नापिकीमुळे आणि पैसेवारी ५0 पेक्षा कमी आल्याने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी लावून धरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या दुसर्‍या अर्थसंकल्पात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होईल, या अपेक्षेत असलेल्या जिल्हावासीयांना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठेंगा दाखविला. आमदार राजेंद्र पाटील यांनी ३0 डिसेंबर २0१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये वाशिम जिल्हय़ाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली होती; मात्र शासनाने याकडे लक्ष दिले नसल्याने जिल्हावासीयांमधून रोष व्यक्त होत आहे.
ग्रामीण भाग, अल्पसंख्याक, शेतकर्‍यांच्या प्रमुख समस्यांना बगल देण्यात आली. उच्च शैक्षणिक महाविद्यालय, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, एमआयडीसी विकासासाठी ठोस उपाययोजना आदी कशाचाही अर्थसंकल्पात समावेश नाही.
आगामी काळात अधिवेशनात जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यात समावेश करून निधी मिळावा, अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: The budget is disappointing in the Washim district