महायुतीच्या घटकपक्षांची भाजपाला डोकेदुखी
By Admin | Updated: August 27, 2014 00:56 IST2014-08-27T00:56:15+5:302014-08-27T00:56:15+5:30
महायुतीतील घटक पक्षांच्या मतदारसंघावरील दाव्याने भाजपा समोरील डोकेदुखी वाढली आहे.

महायुतीच्या घटकपक्षांची भाजपाला डोकेदुखी
अकोला: लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजप-शिवसेना या दोन पक्षांच्या युतीमध्ये घटक पक्षांचा समावेश झाला व या युतीचे महायुतीत रूपांतर झाले. या महायुतीतील घटक पक्षांना सांभाळून घेण्याची जबाबदारी भाजपा आणि सेना या दोन्ही पक्षांची असली तरी प्रत्यक्षात मात्र या घटक पक्षांच्या मतदारसंघावरील दाव्याने भाजपा समोरील डोकेदुखी वाढली आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम या तीन जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसंग्राम व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीन मतदारसंघावर दावा केला आहे. विशेष म्हणजे हे तीनही मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात सध्या भाजपाकडे आहेत. पश्चिम विदर्भातून सर्वाधिक आमदार देणार्या बुलडाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघ भाजपाकडे, तर चार सेनेकडे आहेत. खामगाव, चिखली, जळगाव व मलकापूर या तीन मतदारसंघात भाजपाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. चिखली व खामगाव या मतदारसंघात गेल्यावेळी भाजपाला यश मिळविता आले नाही. यापैकी चिखली मतदारसंघात २00९ मध्ये आमदार असलेल्या रेखाताई खेडेकर यांचे तिकीट कापून ऐनवेळी प्रकाशबुवा जवंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे येथे भाजपाचा पराभव झाला. तर खामगावमध्ये सतत तीन वेळा भाजपाचा पराभव होत आहे. या दोन मतदारसंघांपैकी चिखली मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दावा केला आहे. महायुतीच्या कोट्यातून स्वाभिमानीला चिखली हा मतदारसंघ हवा असून, तशी जय्यत तयारी स्वाभिमानीने केली आहे. हवे तर महायुती तुटेल; मात्र चिखली घेऊ, अशी निर्वाणीची भाषा स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी यांनी येथील मेळाव्यात केली होती. या पृष्ठभूमीवर चिखलीतील भाजपा वतरुळात अस्वस्थता आहे. भाजपाकडे उमेदवारीसाठी दावेदारांची प्रचंड मोठी लिस्ट असून, स्वाभिमानीच्या दाव्यामुळे हे सर्वच दावेदार आपापल्या गॉडफादरकडे लॉबिंग करताना दिसत आहे.