बहुजन समाजाची मोट बांधण्यात भारिप-बमसंला अपयश !
By Admin | Updated: May 16, 2014 21:30 IST2014-05-16T21:09:52+5:302014-05-16T21:30:43+5:30
अकोला जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेतील गचाळ कारभार भारिप-बमसंला भोवला; राजकीय विश्लेषकांचे मत

बहुजन समाजाची मोट बांधण्यात भारिप-बमसंला अपयश !
अकोला : बौद्धतेतर समाजाची मोट बांधण्यात आलेले अपयश आणि सत्ता असलेल्या जिल्हा परिषद व महापालिकेतील गचाळ कारभारामुळे लोकसभा निवडणुकीत भारिप-बमसंचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर हे तिसर्या क्रमांकावर फेकले गेले, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंची १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सत्ता आहे. पक्ष संघटनेतही सर्वच समाजातील धुरिणींना स्थान देण्यात आले. वेळोवेळी भारिप-बमसंने इतर समाजातील घटकांना विधानसभा, जिल्हा परिषद आणि महापालिकेतील सत्तेत सहभागी करून घेतले. जेणेकरून लोकसभेत बौद्ध समाजासह सत्तेत सहभागी करून घेतलेल्या समाजातील नेते, पदाधिकार्यांची मते पारड्यात पडतील. मात्र, प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भारिप-बमसंला बौद्ध समाज वगळता इतर समाजातील मते खेचण्यात यश आल्याचे दिसून येत नाही.
यंदाच्या निवडणुकीत १ लाख ८२ हजार ३७१ मतदार वाढले. हे नवमतदार खेचण्यात भारिप-बमसंला अपयश आल्याचे दिसून येते. २००९ च्या निवडणुकीत भारिप-बमसंचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख २२ हजार ६७८ मते तर यंदाच्या निवडणुकीत त्यांना २ लाख ३८ हजार ७७६ मते मिळाली. या निवडणुकीत ते तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. जिल्हा परिषद आणि मनपामध्ये भारिप-बमसंची सत्ता असून, दिवसेंदिवस जिल्हा आणि महानगराची अवस्था बकाल होत आहे. बहुजन समाजाची मोट न बांधणे, रस्ते, पाणी, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात पक्षाला यश आलेले नाही.