बांबूपासून निर्मित राख्या जोडणार ‘लवादा’शी अनोखं बंधन..
By Admin | Updated: August 29, 2015 00:13 IST2015-08-29T00:13:38+5:302015-08-29T00:13:38+5:30
मेळघाटातील आदिवासी बांधवांनी तयार केल्या राख्या.

बांबूपासून निर्मित राख्या जोडणार ‘लवादा’शी अनोखं बंधन..
राम देशपांडे/अकोला : मेळघाटातील आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या सुरेख आणि रंगीबेरंगी राख्या यंदा बहिणींना आकर्षित करीत आहेत. शहरी संस्कृती आणि शिक्षणापासून दूर असलेल्या मेळघाटातील लवादा या लहानशा लोकवस्तीतील आदिवासी बांधवांनी या राख्या तयार केल्या असून, यातून गोळा होणारा पैसा परत त्यांच्या कल्याणासाठी वापरला जाणार आहे. मेळघाट, अमरावती जिल्हय़ातील या घनदाट अरण्यात लहानसं गाव आहे लवादा. मध्यंतरीच्या काळात कुपोषित बालकांमुळे प्रकाशझोतात आलेलं धारणी तालुक्यातील हे गाव पूर्णत: बांबूंच्या वृक्षांनी वेढलेलं आहे. शहरापासून कोसो दूर असलेल्या या लोकवस्तीतील आदिवासी बांधव शिक्षणापासूनही तितकेच दूर आहेत; मात्र हस्तकला त्यांच्यात ठासून भरलेली आहे. बांबूपासून तयार केलेल्या अनेक वस्तूंचा उपयोग त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात करून घेतला आहे. बांबूंचा वापर करून वास्तूकलेचा सुरेख नजारा त्यांनी आपल्या वस्त्यांमध्ये साकारलेला दिसून येतो. आर्थिक पाठबळ मिळावं याकरिता बांबूपासून तयार केलेल्या अनेक वस्तू ते विक्रीसाठी शहरात पाठवितात. यंदा त्यांनी बांबूचा वापर करून रक्षाबंधनाकरिता रंगीबेरंगी राख्या तयार केल्या आहेत. या सुरेख राख्या अकोल्यातील मिहीर उद्योग केंद्राचे संचालक भूषण बापट यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. पाहताक्षणीच पसंत पडणार्या या राख्या अकोलेकरांसाठी विशेष आकर्षण ठरत असून, त्यांच्या विक्रीतून गोळा होणारा पैसा लवादातील आदिवासी बांधवांना पाठविण्यात येणार असल्याचे ते सांगतात. आदिवासी बांधवांचे राहणीमान, त्यांचे जीवनमान, त्यांचे आचार-विचार या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी काही वर्षांपूर्वी लवादा येथे पोहोचलेल्या नागपूर येथील सुनील व निर्मला देशपांडे या दाम्पत्याने आदिवासी बांधवांसोबत कायम वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला होता. आदिवासी बांधवांची लोकवस्तीच आपलं जग आहे, असं मानणार्या देशपांडे दाम्पत्याने लवादातील बांबूपासून निर्मित राख्या व हस्तकलेचे इतर साहित्य महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख शहरं आणि परदेशातही पोहोचविले आहे. संपूर्ण बांबू केंद्र व वेणू शिल्पी औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे. या साहित्याच्या विक्रीतून गोळा होणारा पैसा हा मेळघाटातील, विशेषत: लवादातील आदिवासी बांधवांच्या कल्याणार्थ वापरला जातो, अशी माहिती भूषण बापट यांनी दिली.