कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला!
By Admin | Updated: December 12, 2015 02:48 IST2015-12-12T02:48:10+5:302015-12-12T02:48:10+5:30
आकोट तालुक्यातील दहीहांडा येथे कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला.

कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला!
अकोला : आकोट तालुक्यातील दहीहांडा येथे कत्तलखान्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करून, मारहाण व मोटारसायकलची नासधूस केल्याची घटना ११ डिसेंबर रोजी दुपारी १२.१५ ते २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी दहीहांडा येथील १00 ते १२५ लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दहीहांडा येथील कसाईपुर्यात असलेल्या कत्तलखान्यात गोवंशाची कत्तल करून मांसविक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून दहीहांडा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दयाराम राठोड हे शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजता कत्तलखान्यात पोहोचले. त्यावेळी ही घटना घडली. राठोड यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार, कापलेल्या बैलाचा पंचनामा करून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते नेत असताना १00 ते १२५ स्त्री-पुरुषांच्या जमावाने त्यांना मोटारसायकलवरून खाली पाडले. मारहाण करून त्यांच्या मोटारसायकलची नासधूस केली. जमावाने सरकारी कामात अडथळा आणला, अशी तक्रार हेड कॉन्स्टेबल दयाराम राठोड यांनी दहीहांडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानुसार १00 ते १२५ लोकांविरुद्ध भा.दं.वि.च्या १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३५३ व ४२७ कलमांसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चा सुधारित कायदा २0१५च्या ५ (क), ९, ११ कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी, आकोटचे ठाणेदार कैलास नागरे, तेल्हार्याचे ठाणेदार अन्वर शेख यांनी दहीहांडा येथे भेट दिली. या गुन्ह्याचा तपास दहीहांडाचे ठाणेदार डी.पी.घुगे व पोलीस उपनिरीक्षक दोनकलवार हे करीत आहेत.