भांबेरी येथे कृत्रिम पाणीटंचाई
By Admin | Updated: May 7, 2014 04:14 IST2014-05-06T19:02:34+5:302014-05-07T04:14:06+5:30
भांबेरी : विद्युत वितरण कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे येथील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठा प्रभावित होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

भांबेरी येथे कृत्रिम पाणीटंचाई
भांबेरी : विद्युत वितरण कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे येथील ग्रामस्थांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठा प्रभावित होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
येथील विद्युत कंपनीचा कारभार पूर्णत: ढेपाळला असून, येथे कार्यरत कर्मचारी, अभियंता येथील कार्यालयात हजर राहत नाही. कर्मचार्यांनी मुख्यालयी राहावे, असा नियम आहे; परंतु येथे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी सुरू आहे. भांबेरी येथे सोमवार ते बुधवार सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० आणि गुरुवार ते रविवार रात्री ११.३० ते सकाळी ९.३० अशा प्रकारे थ्री फेजची विद्युत मिळते; परंतु येथे एकही कर्मचारी नसल्याने रात्री लाईनवर बिघाड झाल्यावर पाणीपुरवठ्याच्या मशीन बंद पडतात. त्याविषयी माहिती किंवा दुरुस्तीसाठी इंजिनीअर वा कर्मचारी यांना फोन लावले, तर त्यांचे फोन बंद असतात. फोन चालू असला, तर प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पूर्ण रात्र अंधारात काढावी लागते. शिवाय पाणीपुरवठाही प्रभावित होतो. या गावाला गाडेगाव शिवारातील कूपनलिकेवरून पाणीपुरवठा होतो. गावानजीकच्या विहिरीला खारे पाणी असल्याने गावानजीक पिण्याचे पाणीच नाही. हे गाव खारपाणप्यात येत असल्यामुळे दूरवरून या गावाला पाणीपुरवठा होतो. त्यात विद्युत मंडळाच्या लहरीपणामुळे येथील पाणीटंचाई निर्माण झाली आहे. (वार्ताहर)