घोषणांचा बाजार; फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST2021-05-08T04:18:40+5:302021-05-08T04:18:40+5:30
अकोला : संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने व्यवसाय बंद राहणाऱ्या फेरीवाल्यांना दीड हजार आर्थिक साहाय्य देण्याचे घोषित केले होते. ...

घोषणांचा बाजार; फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही!
अकोला : संचारबंदी लागू करताना राज्य शासनाने व्यवसाय बंद राहणाऱ्या फेरीवाल्यांना दीड हजार आर्थिक साहाय्य देण्याचे घोषित केले होते. अकोला शहरातील यात ६ हजार ४ नोंदणीकृत फेरीवाले आहे; मात्र या फेरीवाल्यांच्या हाती एक पैसाही पडला नाही. त्यामुळे हा केवळ घोषणांचा बाजार नाही ना? असे विचारले जात आहे. शासनाने लागू केलेल्या संचारबंदीत भाजीपाला, फळे, किराणा दुकान, मेडिकल, किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेते, कृषी अवजारे यांना वगळून इतर सर्व फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरात सद्य:स्थितीत नोंदणीकृत ६ हजार ४ विविध प्रकारचे फेरीवाले आहेत. या फेरीवाल्यांना संचारबंदीत दीड हजार रुपये आर्थिक मदत करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील मनपाकडे नोंदणी असलेल्या फेरीवाल्यांनाच ही मदत मिळणार असून, लवकरच याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती. या फेरीवाल्यांना थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार होते. मात्र, या रकमेतील एक दमडीही फेरीवाल्यांच्या हाती आली नाही. ही मदत केव्हा मिळणार, याची शाश्वती नाही. त्यामुळे संचारबंदीच्या कठीण काळात ही मदत तत्काळ देण्याची मागणी होत आहे.
--पॉईंटर--
जिल्ह्यातील नोंदणीकृत फेरीवाले
६,००४
नोंदणी नसलेल्यांची संख्या
२३५१
--कोट--
फेरीवाले म्हणतात...
शासनाच्या या तुटपुंज्या मदतीत पुरेसा किराणाही होणार नाही; परंतु कोरोनाच्या काळात घरखर्च चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे हाती आलेला रुपयाही कामाचा आहे. त्यामुळे ही मदत लवकर मिळावी, हीच अपेक्षा आहे.
- विनेश वाणी
--कोट--
शासनाच्या दीड हजार रुपये देण्याच्या घोषणेला महिना उलटून गेला आहे. अद्यापपर्यंत रुपयाही प्राप्त झाला नाही. संचारबंदीमुळे सर्व व्यवसाय ठप्प आहे. यापुढे हीच स्थिती राहिल्यास घरखर्च चालविणे अशक्य होणार आहे.
- पांडुरंग इंगळकर
--कोट--
दिवसाला ४००-५०० रुपये व्यवसाय सुटत होता; परंतु संचारबंदीमुळे पैशांची आवक बंद आहे. व्यवसाय सुरू नसल्याने अनेक अडचणी येत आहे. घरखर्च कसा चालवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- शे. कलीम
--कोट--
आम्ही नोंदणीकृत फेरीवाल्यांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सोपवली. आत्मनिर्भर याेजनेतून त्यांना कर्जासाठी २७२६ फेरीवाल्यांना पात्र ठरविले आहे. त्यांच्यासह ज्यांची नाेंदणी १५ एप्रिल २०२१ पूर्वी झाली आहे, त्या सर्वांना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घाेषणेचा लाभ मिळेल. सध्या तरी लाभार्थींना रक्कम प्राप्त झाली नाही, थेट त्यांच्याही खात्यात रक्कम जमा होईल.
- गणेश बिल्लेवार, समन्वयक 'एनयूएलएम', मनपा