अन् आयटीआयमध्ये प्रवेशाची झाली पंचाईत..!
By Admin | Updated: June 12, 2015 17:48 IST2015-06-12T17:48:25+5:302015-06-12T17:48:25+5:30
कर्मचा-यांची झाली धावपळ; आयटीआयमधील प्रकार.

अन् आयटीआयमध्ये प्रवेशाची झाली पंचाईत..!
अकोला : दहावी, बारावीचा निकाल नुकताच लागल्याने ग्रामीण भागासह शहरातील अनेक विद्यार्थी आयटीआयच्या प्रवेशासाठी धावपळ करीत आहेत. सध्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. ऑनलाइन नोंदणी करताना मध्येच इंटरनेट पॅक संपल्याने सर्फिं गची गती मंदावली अन् विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पंचाईत झाली. हा प्रकार गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास येथील आयटीआयमध्ये घडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कर्मचार्यांमध्ये एकच धावपळ झाली. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी शासनाने आयटीआय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आयटीआय प्रवेश अर्ज इतर ठिकाणांहूनदेखील करता येतो. तथापि, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील आयटीआय केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्या आनुषंगाने शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी गुरुवार, ११ जून रोजी आयटीआयमध्ये गर्दी केली होती. ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू असताना अचानक इंटरनेट सर्फिंगची गती मंदावली. त्यामुळे विद्यार्थ्यांंंना ताटकळत बसावे लागले. दुसरीकडे महिन्याच्या प्रारंभीच अचानक इंटरनेटचा नेट पॅक संपल्याने आयटीआय कर्मचार्यांमध्ये धावपळ झाली. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आयटीआयच्या दोन कर्मचार्यांनी बी.एस.एन.एल. कार्यालय गाठले. महिनाभर पुरणारे नेट पॅक दहा दिवसांतच संपल्याने अज्ञाताकडून त्याची चोरी होत असावी, असा अंदाज आयटीआयमार्फत लावण्यात आला; परंतु नेट पॅकला पासवर्ड असल्याने त्याची चोरी होऊ शकत नसल्याचे टेलिफोन कंपनीच्या अधिकार्यांनी सांगीतले तसेच आयटीआयमध्येच इंटरनेटचा उपयोग झाल्याने नेट पॅक संपल्याचेदेखील टेलिफोन कंपनीमार्फत सांगण्यात आले. तेव्हा आयटीआयमधील नेट पॅक संपवणारा तो कोण, याचे गूढ कायम आहे.