लाचखोर ठाणेदारासह पाचही पोलीस निलंबित
By Admin | Updated: August 1, 2016 01:19 IST2016-08-01T01:16:48+5:302016-08-01T01:19:00+5:30
रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्याकडून साडेसहा हजार रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण.

लाचखोर ठाणेदारासह पाचही पोलीस निलंबित
अकोला : रेल्वे स्टेशन परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणार्या फेरीवाल्याकडून साडेसहा हजार रुपयांची लाच घेणार्या अकोला जीआरपीचे ठाणेदार तथा साहायक पोलीस निरीक्षक राजकुमार वानखडे, पोलीस कर्मचारी गौतम शिरसाट, शरद जुनघरे, सतीश चव्हाण आणि सुनील कडू या पाचही लाचखोर पोलीस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. नागपूर जीआरपीचे पोलीस अधीक्षक यांनी रविवारी तडकाफडकी या पाचही लाचखोरांच्या निलंबनाचा आदेश अकोला जीआरपीला पाठविला आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात तसेच रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणार्या फेरीवाल्यास खाद्यपदार्थांची विक्री करावयाची असेल, तर दर महिन्याला साडेसहा हजार रुपयांचा हप्ता आणि कारवाई टाळण्यासाठी अकोला जीआरपीचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार तुकाराम वानखडे, जीआरपी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी गौतम हरिभाऊ शिरसाट, शरद बाळाभाऊ जुनघरे, सतीश जसवंतसिंह चव्हाण आणि सुनील लक्ष्मण कडू या पाच लाचखोरांनी फेरीवाल्यास साडेसहा हजार रुपयांची लाच मागितली होती. गुरुवारी दिवसभर फेरीवाल्याकडे तगादा लावून रक्कम देण्यास त्याला बाध्य केले. त्यानंतर शुक्रवारी जीआरपीच्या पोलीस अधिकार्यासह कर्मचार्यांचा हा प्रताप सुरूच असल्याने फेरीवाल्याने या प्रकाराची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख उत्तम जाधव यांनी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून साहायक पोलीस निरीक्षक राजकुमार वानखडे, गौतम शिरसाट, शरद जुनघरे, सतीश चव्हाण आणि सुनील कडू या पाच लाचखोर पोलिसांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून शनिवारी पाचही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर लगेच रविवारी नागपूर जीआरपीच्या पोलीस अधीक्षकांनी या पाचही लाचखोरांना निलंबित केल्याचा आदेश अकोला जीआरपीला पाठविला.
जीआरपी पोलीस स्टेशनचे सर्वेसर्वा असल्याच्या तोर्यात या पाचही पोलिसांनी अनेक फेरीवाल्यांना पैशासाठी प्रचंड वेठीस धरल्याच्या तक्रारी आता नागपूर जीआरपीकडे गेल्या असून, या पाचही लाचखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.