अकोला जिल्ह्यात रिमझिम पाऊस
By Admin | Updated: October 26, 2014 00:43 IST2014-10-26T00:43:42+5:302014-10-26T00:43:42+5:30
रब्बीसह खरीप पिकांसाठी ठरणार उपयुक्त.

अकोला जिल्ह्यात रिमझिम पाऊस
अकोला: रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात असतानाच, शनिवारी अकोल्या जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा व वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. विभागातील यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. हा पाऊस रब्बी पेरण्यांसह खरीप पिकांसाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे, कृषी विभागाचे म्हणणे आहे.
यावर्षी पावसाळ्यास तब्बल सव्वा महिना उशिराने झालेला प्रारंभ आणि त्यानंतरही पावसाचे कमी प्रमाण, यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद इत्यादी कमी कालावधीच्या पिकांची अत्यल्प प्रमाणात पेरणी झाली. दुसरीकडे गत काही वर्षांपासून, कापसाला मागे टाकून विभागातील प्रमुख पिकाचा मान पटकाविलेल्या सोयाबीनचे एकरी उत्पादन केवळ ५0 किलो ते एक क्विंटलपर्यंत घसरल्याने, पश्चिम विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके बुडाल्याने, यंदा शेतकरी दिवाळी साजरी करू शकला नाही.
खरिपातील नुकसान निदान रब्बी हंगामात तरी भरुन काढता येईल, या आशेने शेतकर्यांनी रब्बी हंगामातील पेरणीची तयारी सुरु केली असली तरी, जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नसल्याने, अद्यापही सार्वत्रिक रब्बी पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. शेतकर्यांना रब्बी पेरण्यांसाठी पावसाची प्रतीक्षा होती. शनिवारी सकाळपासूनच अकोला, बुलडाणा जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली, तर अमरावती व वाशिम या दोन जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस झाला. यवतमाळसह विभागातील पाचही जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. रिमझिम पावसामुळे हरभरा, करडी आदी रब्बी पिकांच्या रखडलेल्या पेरण्या सुरू होण्याची अपेक्षा, कृषी विभागातर्फे व्यक्त केली जात आहे. हा पाऊस खरीप हंगामातील कपाशी पिकासाठीही उपयुक्त ठरणार आहे.