कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांंना मिळणार गुणवाढ !
By Admin | Updated: July 20, 2015 23:09 IST2015-07-20T23:09:05+5:302015-07-20T23:09:05+5:30
कृषी विद्यापीठ निम्न शिक्षण विभागाचा निर्णय; राष्ट्रीय युवाशक्ती संघटनेचा पावसात मोर्चा.

कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांंना मिळणार गुणवाढ !
अकोला : विदर्भातील खासगी कृषी तंत्रनिकेतनच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांंंना गुणवाढ देण्याचा निर्णय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने घेतला आहे. या मागणीसाठी राष्ट्रीय युवाशक्ती संघटनेच्यावतीने सोमवारी भर पावसात कृषी विद्यापीठ प्रशासन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. विद्यार्थ्यांना मिळालेल्या कमी गुणाचा प्रश्न लोकमतने ठळकपणे मांडला होता, हे विशेष. विदर्भातील ४६ खासगी कृषी तंत्रनिकेतनचा निकाल यंदा अवघा १२ टक्के लागला. २४५७ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांंंचे भविष्य टांगणीला लागल्याने राष्ट्रीय युवाशक्ती संघटनेने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. संघटनेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांंंचा मोर्चा सोमवारी कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले यांच्या दालनात पोहोचला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विमल जैन, निम्न कृषी शिक्षण संचालक डॉ. डी. तामगाडगे आणि डॉ. भाले यांच्यात चर्चा झाली. जे विद्यार्थी दोन किंवा पाच गुणांनी अनुत्तीर्ण झाले असतील त्या विद्यार्थ्यांंंना दोन विषयांमध्ये पाच गुणांची वाढ (ग्रेस मार्क) देण्याचा अधिकार कृषी विद्यापीठाला असल्याने डॉ. भाले यांनी या विद्यार्थ्यांंंना कमीत कमी पाच गुण वाढवून देण्याचे आश्वासन दिले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत विदर्भात ४६ खासगी कृषी तंत्रनिकेतन असून, यामध्ये कृषी विद्यापीठाच्या ९ तंत्रनिकेतन शाळांचा समावेश आहे. यंदा प्रथमच पहिल्या तुकडीचा निकाल लागला आहे; पण २७३३ पैकी तब्बल २४५७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, १७ महाविद्यालयांचा निकाल केवळ २ टक्के लागला आहे. या तीन वर्षांंंच्या अभ्यासक्रमात प्रथम व द्वितीय वर्षात लेखी व प्रात्यक्षिक मिळून गुण दिले जातात, तर तिसर्या वर्षी लेखी व प्रात्यक्षिक वेगळे करून गुण दिले जातात. त्यामुळे काही विद्यार्थ्यांंंंना प्रात्यक्षिकात १00 पैकी ९0 पेक्षा जास्त गुण मिळाले असून, लेखी परीक्षेत तीन ते चार गुणच मिळाले आहेत. सरासरी ७५ टक्के गुण मिळालेले विद्यार्थीही अनुत्तीर्ण झाले आहेत. यासंदर्भात निम्न कृषी शिक्षण विभागाचे संचालक प्रा डी तामगाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांंंना कमीत कमी पाच गुणांची वाढ देण्याचा निर्णय कृषी अधिष्ठातांच्या संमतीने घेण्यात आला असून, तसे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाच गुणांअभावी जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असतील, ते यामुळे उत्तीर्ण होतील.