कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच

By Admin | Updated: July 29, 2014 20:26 IST2014-07-29T20:26:35+5:302014-07-29T20:26:35+5:30

एक महिन्यानंतर ट्रॅक्टरने पेरणीला सुरुवात

Agitation of employees of Agriculture University | कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच

कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे २५ मजूर संपावर गेल्याने कृषी विद्यापीठाच्या साडेतीन हजार एकरावरील पेरण्यांचे काम खोळंबले असताना कृषी विद्यापीठाच्या ट्रॅक्टरचालकांना समजावण्यास विद्यापीठाला यश आल्याने पेरणीला सुरुवात झाली आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी कृषी विद्यापीठाचे अधिकारी कर्मचार्‍यांना घेऊन मुंबईला गेले आहेत.
रोजंदारी मजुरांना योग्य मजुरी देण्यात यावी, ट्रॅक्टरचालक व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कर्मचारी २५ जूनपासून संपावर गेले आहेत. या काम बंद आंदोलनामुळे विद्यापीठ प्रक्षेत्रावरील मशागत व पेरणीची कामे ठप्प पडली आहेत. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात घाण साचली आहे. पशुसंवर्धन विभाग व प्रत्येक विभागातील गोठय़ात गुरांचे शेण साचले आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे अकोला येथील मध्यवर्ती संशोधन विभाग व वणी रंभापूर येथील मुख्य बीजोत्पादन क्षेत्रावरील जवळपास साडेतीन हजार हेक्टरवरील मशागतीची कामे ठप्प पडली आहे.
ट्रॅक्टर, वाहनचालकांना ५00 रुपये, रोजंदारी मजुरांना नवीन रोजंदारी वेतनाप्रममाणे ३५0 रुपये देण्यात यावेत, वाहनचालकांची भरती करताना ती केवळ कृषी विद्यापीठांतर्गतच करावी, नवीन प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्यात यावे, स्वेच्छेने काम सोडणार्‍या कर्मचार्‍यांना उपदानाची रक्कम लवकर देण्यात यावी आदी मागण्यांसाठी या कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे.
कर्मचारी कामावर परत येत नसल्यामुळे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ, अधिकार्‍ंयाना प्रत्येक विभागावर गस्त घालावी लागत आहे. त्यासाठी या शास्त्रज्ञ, अधिकार्‍यांच्या पाळ्य़ा ठरविण्यात आल्या आहेत. दरम्यान, ट्रॅक्टरचालकांच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे पेरणीच्या कामांना मात्र सुरुवात झाली आहे.

Web Title: Agitation of employees of Agriculture University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.