शेतक-यांवर पुन्हा अस्मानी संकट!
By Admin | Updated: December 24, 2014 01:20 IST2014-12-24T01:20:52+5:302014-12-24T01:20:52+5:30
कपाशीवर लाल्या, तुरीवर किडींचा हल्ला; हरभरा किडींनी केला फस्त.

शेतक-यांवर पुन्हा अस्मानी संकट!
मनोज भिवगडे /अकोला
नापिकी आणि कर्जबारीपणामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा अस्मानी संकटाने अडचणीत आला आहे. अल्पशा पावसामुळे खरिपाचे पीक हातातून गेलेल्या शेतकर्यांनी रब्बीच्या पिकांकडे आशेने बघणे सुरू केले होते, मात्र किडीने रातोरात होत्याचे नव्हते करून शेतकर्यांना पुन्हा अडचणीत आणले आहे. कपाशीवर लाल्या आणि तुरीवर आलेल्या किडीपाठोपाठ बोनोसेफॅलम बीटल (काळ्य़ा म्हशी) या किडींनी हरभराही फस्त केला आहे. याचा सर्वाधिक फटका खारपाणपट्टय़ातील हजारो कोरडवाहू शेतकर्यांना बसला आहे.
यंदाच्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. १0 सप्टेंबरपासून जिल्ह्यात पिकांसाठी आवश्यक पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. सोयाबीन पेरणार्या शेतकर्यांना त्याचा फटका बसला. त्यापुढील ४0 दिवस पाऊस न झाल्यामुळे रब्बीचा पेराही खोळंबला. साधारणत: १५ ऑक्टोबरच्या सुमारास रब्बीतील हरभर्याची पेरणी केली जाते. पाऊस नसल्याने अनेक शेतकर्यांनी पेरणीच केली नाही. काहींनी धाडस करून कोरड्या जमिनीतच महागडे बियाणे टाकले, मात्र तेही उगवले नाही. त्यामुळे दुबार आणि त्यानंतर तिबार पेरणी करण्याचे संकट जिल्ह्यात शेतकर्यांवर कोसळले. त्यातही काही शेतकर्यांनी डिेझल पंपाच्या मदतीने आणि टॅक्टरवर पाणी शेतात नेऊन हरभरा, तूर, कपाशी या पिकांना पाणी दिले, मात्र हवामानातील बदलानंतर या पिकांवर किडींचा प्रादरुभाव झाल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. तुरीचा फुलोर ढगाळ वातावरणामुळे गळला, तर कपाशीचे पीक लाल्या रोगामुळे नष्ट होणार्या मार्गावर आहे. लाल्या रोगाचा फटका मूर्तिजापूर तालुक्यासोबतच अकोला आणि आकोट तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकर्यांना बसला. खारपाणपट्टय़ातील तुरीचा फुलोर मागील आठवड्यात गळल्यामुळे म्हैसांग, अंबिकापूर, दापुरा, कट्यार, मजलापूर आदी परिसरातील तुरीचे पीक हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.