महात्मा गांधींच्या हत्येनंतर सत्य लपवून असत्याचा प्रचार अधिक!
By Admin | Updated: February 5, 2016 02:06 IST2016-02-05T02:06:45+5:302016-02-05T02:06:45+5:30
तुषार गांधी यांनी ‘गांधी समजून घेताना’ व्याख्यानात हिंदुत्ववादी संघटनांच्या अतिमहत्त्वाकांक्षेवर प्रहार केला.

महात्मा गांधींच्या हत्येनंतर सत्य लपवून असत्याचा प्रचार अधिक!
अकोला: महात्मा गांधी यांची हत्या ही कुण्या एका व्यक्तीची नव्हे, तर विचारांची हत्या होती. महात्मा गांधींच्या विचारांनी हिंदुत्ववाद्यांच्या महत्त्वाकांक्षेला ठेच पोहचवल्याने त्यांची 'हिंदू राष्ट्र' संकल्पना प्रत्यक्षात साकारताना दिसत नव्हती. त्यामुळे गांधींची हत्या करून सत्य लपवून त्यांच्याबाबत अपप्रचारच अधिक करण्यात आल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
आम्ही सारे फाउंडेशन आणि बहुजन पत्रकार संघ यांच्यावतीने गुरुवारी प्रमिलाताई ओक हॉलमध्ये आयोजित 'गांधी समजून घेताना' या विषयावरील व्याख्यानात तुषार गांधी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजाभाऊ देशमुख, नानासाहेब चौधरी, प्रा. मधु जाधव हे विचारवंत उपस्थित होते. यावेळी डॉ. गजानन नारे, सुहास उदापूरकर, प्रदीप अवचार, गजानन घोंगडे, निरज आवंडेकर, अनिल महोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बापूंना समजून घेताना त्यावेळच्या परिस्थितीचे अवलोकन केले तेव्हा गांधींच्या हत्येमागील सत्य कधी पुढे येऊच दिले नाही, याबाबत आश्चर्य वाटले. सत्य समजून घेतले नाही, तर ज्या तत्त्वांनी बापूंची हत्या केली, त्यांचा विचारच इतिहास होईल. सत्य कधी समजून घेतले नाही, तर हा इतिहास अभ्यासातील एक धडा होऊन बसेल. बापूंची हत्या होण्यापूर्वी दहा दिवस आधी त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. त्यानंतरही सुरक्षा यंत्रणांनी कोणतीच काळजी का घेतली नाही? पुन्हा येऊ, असा इशारा देऊन गेल्यानंतर हत्या कशी झाली? या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा कुणी प्रयत्न केला नाही. देशाची फाळणी, पाकिस्तानला दिलेले ५५ कोटी रुपये यासाठी बापूंना दोषी ठरवून त्यांच्या हत्येमुळे हा देश वाचला असल्याचा अपप्रचार केला जातो.
प्रत्यक्षात महात्मा गांधी यांच्यावर पहिला हल्ला १९३४ मध्ये झाला, त्यावेळी देशाची फाळणी झाली नव्हती, पाकिस्तानला पैसे ही दिले नव्हते. राजकारणापासून दूर होत बापूंनी सामाजिक कार्याला वाहून घेतले होते. त्यावेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले. बापूंवर झालेल्या हल्याच्या वेळी वारंवार एका व्यक्तीचे नाव पुढे येत होते, ते म्हणजे नाथुराम गोडसे. याबाबत सबळ पुरावे त्यावेळी मिळाले होते. बापूंच्या प्रार्थनेच्या वेळीही त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. २0 जानेवारी १९४८ ला बापूंच्या प्रार्थनेच्या वेळी बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी मदनलाल पकडल्या गेला. त्यानंतर दहा दिवसांमध्येच त्यांची हत्या नाथुराम गोडसेने केली. ही हत्या करण्यासाठी गोडसेकडे पिस्तूल आले कोठून? त्यासाठी पैसा कुणाचा होता? तात्याराव म्हणजे सावरकरांचा आशीर्वाद नाथुराम आणि आपटे यांनी कशासाठी घेतला होता? सावरकरांनी त्यांना विजयी होऊन या, हा आशीर्वाद कशासाठी दिला? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून कधीच झाला नाही. हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी पाच राज्यांनी मिळून प्रयत्न केला होता. त्यात ग्वाल्हेरचा समावेश होता. ग्वाल्हेर येथूनच नाथुराम गोडसेकडे पिस्तूल आले. ज्या परचुरेच्या माध्यमातून त्याच्याकडे पिस्तूल आले, तो परचुरे ग्वाल्हेर राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बाळगून होता. त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याने तोही सुडाच्या राजकारणाने या कटात सहभागी झाला होता. त्याचा तपास यंत्रणांनी का केला नाही? सावरकरांना वाचविण्यासाठी बडगेला साक्षीचा माफीदार केले. एकसारखेच पुरावे असताना दोघांना निर्दोष सोडले. त्याच पुराव्यावर दोघांना जन्मठेप देण्याचा निर्णय कसा झाला? या प्रश्नांची उत्तर शोधली तेव्हा सत्य पुढे आले आणि तेच मी येथे मांडले असल्याचे तुषार गांधी शेवटी म्हणाले. आभार प्रदर्शन अशोक ढेरे यांनी केले.