राज्यातील ७५ हजारांवर ग्रामीण शाळांचे अस्तित्व धोक्यात

By Admin | Updated: May 22, 2015 01:55 IST2015-05-22T01:55:45+5:302015-05-22T01:55:45+5:30

पटसंख्येत घट होत असल्यामुळे आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे.

75 thousand rural schools exist in the state | राज्यातील ७५ हजारांवर ग्रामीण शाळांचे अस्तित्व धोक्यात

राज्यातील ७५ हजारांवर ग्रामीण शाळांचे अस्तित्व धोक्यात

हर्षनंदन वाघ/बुलडाणा : सध्या शहरी भागातील शाळांच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात विद्यार्थी शोधमोहीम सुरू केली आहे. त्यातच ग्रामीण भागातील पालकांचाही कल आता आपल्या पाल्यांना शहरात शिकविण्याकडे वाढत असल्याने व शहरी भागात कॉन्व्हेंट संस्कृती वाढल्याने ग्रामीण भागातील शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. घटती पटसंख्या, पाच दिवसांचा आठवडा याचाही परिणाम या शाळांवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या राज्यातील जवळपास ७५ हजार ५६ शाळा अडचणीत आल्या आहेत.
राज्यातील विविध शहरांसह ग्रामीण भागातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने शाळांची मोठय़ा प्रमाणात खैरात वाटली होती. त्यामुळे राज्यातील शाळांची संख्या १ लाख ७ हजारांवर पोहोचली. त्यात ग्रामीण भागातील ७५ हजार ५६ शाळांचा समावेश आहे. छोट्या-छोट्या गावांतही माध्यमिक शाळा सुरू झाल्या. दुसरीकडे शाळा वाढल्या असल्या तरी ग्रामीण भागातील लोकसंख्या स्थिर आहे. त्यातच ग्रामीण भागातील नागरिकांचा कल आता शहराकडे वाढल्याने लोक गाव सोडून शहरात स्थिरावले आहेत. जे गावाकडे आहेत, त्यांची मुले बहुतांश शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. अनेक शाळांना तर विद्यार्थीच मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातच विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांना घरोघरी फिरावे लागत असताना शहरी भागातील शिक्षकही विद्यार्थ्यांच्या शोधात ग्रामीण भागात फिरत आहेत. अशा स्थितीत गावातील शाळा भकास पडण्याची चिन्हे आहेत. विद्यार्थी शाळेत दाखल व्हावा, यासाठी शाळांमार्फत गणवेशासह विद्यार्थ्यांना लागणारे इतर सर्व साहित्य देण्याचे आश्‍वासन दिले जाते. यामध्ये गावातून विद्यार्थ्याला शाळेत ये-जा करण्याची व्यवस्थाही शाळाच करीत आहेत.

* पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे
ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असल्याने मराठी शाळांमध्ये शुकशुकाट दिसून येतो. शहरात गल्लोगल्ली कॉन्व्हेंटला उधाण आले असताना ग्रामीण भागातही हे फॅड वाढीस लागले आहे. शहरात आता विद्यार्थी मिळत नाही, हे शहरी शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने व वाढत्या स्पर्धेला तोंड देत शाळा सुरू ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने शिक्षकांना विद्यार्थी शोधमोहिमेवर लावले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात २ हजार ३६४ शाळा
बुलडाणा जिल्ह्यात शासनाने २ हजार ३६४ शाळा सुरू केल्या आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील १ हजार ७९४ शाळा आहेत. या शाळांपैकी काही आदिवासी, दुर्गम भागात आहेत. शासनाने खासगी संस्थांना दिलेल्या आश्रमशाळा, शहरी भागात वसतिगृहाची सोय तसेच नागरिकांचा राहणीमानाचा वाढलेल्या दर्जा आदी कारणांमुळे ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे.

 

Web Title: 75 thousand rural schools exist in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.