६४ गावे तहानलेलीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:13 IST2017-08-25T01:12:04+5:302017-08-25T01:13:08+5:30
जिल्ह्यातल्या खांबोराजवळील उन्नई बंधार्यातील पाणी संपल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गत २५ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याने ६४ खेडी तहानलेलीच असताना, पाणीपुरवठय़ाची कोणतीही उपाययोजना अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे वास्तव समोर येत असून, पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

६४ गावे तहानलेलीच!
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातल्या खांबोराजवळील उन्नई बंधार्यातील पाणी संपल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गत २५ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याने ६४ खेडी तहानलेलीच असताना, पाणीपुरवठय़ाची कोणतीही उपाययोजना अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे वास्तव समोर येत असून, पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्हय़ातील धरणांमधील जलसाठय़ात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामध्ये अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणात अ त्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे खांबोराजवळील उन्नई बंधार्यातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्या तील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गत २५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने, तहानलेल्या गावांसाठी तातडीने पाणी पुरवठा करण्याची कोणतीही उपाययोजना जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनामार्फत अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार आणि पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, असा प्रश्न ६४ गावांमधील ग्रामस् थांकडून उपस्थित केला जात आहे.
दूषित पाण्याचा वापर; आरोग्य धोक्यात!
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद असल्याने आणि खारपाणपट्टा असल्याने, पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत नसल्याने, ६४ गावांमधील ग्रामस्थांना नदी-नाल्याच्या पात्रा तील ‘झिर्या’तील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टंचाई आराखड्यांतर्गत उपाययोजना प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले आहेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी