काळय़ा बाजारात जाणारा ३0 क्विंटल तांदूळ जप्त
By Admin | Updated: September 5, 2015 01:44 IST2015-09-05T01:44:44+5:302015-09-05T01:44:44+5:30
मालवाहू वाहन जप्त; आरोपीस अटक.

काळय़ा बाजारात जाणारा ३0 क्विंटल तांदूळ जप्त
अकोला : काळय़ा बाजारात नेण्यासाठी गोडावूनमधील तांदुळाची पोती मालवाहू वाहनामध्ये भरत असताना, स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांनी छापा घालून तांदूळ जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास मलकापूर परिसरातील अंबिका नगरात करण्यात आली. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, मालवाहू जप्त केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पथकाला मलकापूर भागातून तांदुळाने भरलेले मालवाहू वाहन काळय़ा बाजारात जाणार असल्याची माहिती मिळाली.
एपीआय नागलकर व त्यांच्या पथकाने मलकापूर परिसरातील अंबिका नगरात असलेल्या एका गोडावूनवर छापा घातला. पोलिसांनी ३0 क्विंटल तांदुळाने भरलेले एमएच ३0 एबी ९0८ क्रमांकाचे मालवाहू वाहन जप्त केले.
वाहनामध्ये प्रत्येकी ५0 किलो वजनाची अशी ६0 पोती भरलेली होती.
पोलिसांनी तांदुळाच्या पोत्यांसह जप्त केलेले मालवाहू वाहन खदान पोलीस ठाण्यात जमा केले. पोलिसांनी मालक रितेश विष्णुदास शुक्ला (रा. ओम हाऊसिंग सोसायटी, गोरक्षण रोड) याला अटक केली.
याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास आरोपी शुक्लावर कलम ३७ जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.