पीक विम्याचे २७ कोटी आले!
By Admin | Updated: August 26, 2014 21:58 IST2014-08-26T21:58:34+5:302014-08-26T21:58:34+5:30
अकोला जिल्ह्यातील ६२ हजारांवर शेतकर्यांना दिलासा

पीक विम्याचे २७ कोटी आले!
आकोला : राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक नुकसानभरपाईपोटी शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या २७ कोटी ७ लाख १२ हजार रुपये पीक विम्याची रक्कम अखेर प्राप्त झाली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पीक विमा रकमेच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील ६२ हजार ५४३ शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात सतत पाऊस आणि अतवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यात मूग, उडीद, ज्वारी, तीळ इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांनी पिकांचा विमा उतरविला होता. त्यापैकी ५२ हजार ९३२ हेक्टरवरील पीक नुकसानीच्या भरपाईपोटी जिल्ह्यातील ६२ हजार ५४३ शेतकर्यांसाठी २७ कोटी ७ लाख १२ हजार ५0५ रुपयांची विम्याची रक्कम गेल्या महिन्यात शासनामार्फत मंजूर करण्यात आली. पीक विम्याची मदत मंजूर करण्यात आली; मात्र अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून विम्याची रक्कम उपलब्ध करुण देण्यात आली नव्हती. पीक विम्याची २७ कोटी ७ लाख १२ हजार ५0५ रुपयांची रक्कम २२ ऑगस्ट रोजी कंपनीमार्फत जिल्ह्यातील संबंधित बँकांच्या जिल्हा स्तरावरील मुख्य शाखांना प्राप्त झाली.