शिवभाेजनाने भागवली १.४८ लाख नागरिकांची भूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST2021-06-03T04:14:35+5:302021-06-03T04:14:35+5:30

अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी १५ एप्रिलपासून सुरू झाली होती. तेव्हापासून ते ...

1.48 lakh citizens' hunger quenched by Shiv Bhajan | शिवभाेजनाने भागवली १.४८ लाख नागरिकांची भूक !

शिवभाेजनाने भागवली १.४८ लाख नागरिकांची भूक !

अकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी १५ एप्रिलपासून सुरू झाली होती. तेव्हापासून ते ३१ मे पर्यंतच्या कालावधीत अकोला जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ५०० थाळ्यांचे मोफत वितरण झाले. त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब गरजू लाभार्थ्यांच्या पोटाला आधार झाला.

यासंदर्भात जिल्हा पुरवठा कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, १५ एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंध सुरू झाले होते. त्या पार्श्वभूमीवर रोजंदारीने कामावर जाणारे, गोरगरीब लोकांना भेडसावणारी जेवणाची समस्या सोडविण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या. शिवभोजन थाळी ही त्यातीलच एक. त्या आधी शिवभोजन थाळी ही पाच रुपये दराने उपलब्ध होत होती. निर्बंधांच्या कालावधीत हीच थाळी शासनाने विनामूल्य तसेच शक्य तिथे पार्सल सुविधेद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील १३ शिवभोजन थाळी केंद्रांवरून जिल्हाभरात एक लाख ४८ हजार ५०० थाळ्यांचे मोफत वितरण झाले.

आधी माफक दर, आता माेफत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन थाळी ही योजना २६ जानेवारी २०२० पासून सुरू झाली. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना दहा रुपये दराने भोजन दिले जाते. मात्र, नंतर कोरोना कालावधीत शासनाने हे दर पाच रुपये प्रतिथाळी याप्रमाणे केले. कडक निर्बंधांच्या कालावधीत थाळ्यांचे मोफत वितरण झाले. शहरी भागात आपल्या विविध कामानिमित्त येणाऱ्या गोरगरिबांसाठी स्वस्त दरात स्वच्छ, पोषक आणि ताजे भोजन देणारी ही योजना ठरली आहे.

असे मिळते जेवण

शिवभोजन थाळीमध्ये ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा एक मूद भात आणि १०० ग्रॅमचे एक वाटी वरण इतके भोजन देण्यात येते.

जिल्ह्यात एकूण केंद्रे १३

सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या मुख्यालयी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये अकोला शहर व बार्शीटाकळी येथे प्रत्येकी तीन ठिकाणी, मूर्तिजापूर व तेल्हारा येथे प्रत्येकी दोन ठिकाणी, तर अकोट, बाळापूर, पातूर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण १३ ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. आताही निर्बंध शिथिल झाले असले तरी लोक या थाळीचा लाभ घेऊन आपली भूक शमवीत आहेत.

Web Title: 1.48 lakh citizens' hunger quenched by Shiv Bhajan