‘१०८’ सेवा पश्चिम विदर्भातील ३.५ लाखांवर रुग्णांसाठी ठरली ‘संकटमोचक’

By Atul.jaiswal | Published: October 19, 2018 01:12 PM2018-10-19T13:12:17+5:302018-10-19T13:16:24+5:30

गत पाच वर्षांत १०८ क्रमांकाची ही सेवा पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमधील तब्बल ३ लाख ६५ हजार १३० रुग्णांसाठी संकटमोचक ठरली आहे.

'108' ambulance service serve 3.5 lakh patients in Vidarbha | ‘१०८’ सेवा पश्चिम विदर्भातील ३.५ लाखांवर रुग्णांसाठी ठरली ‘संकटमोचक’

‘१०८’ सेवा पश्चिम विदर्भातील ३.५ लाखांवर रुग्णांसाठी ठरली ‘संकटमोचक’

googlenewsNext
ठळक मुद्दे २०१४ पासून ‘१०८’ ही रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात आरोग्य सुविधांनी सज्ज असलेल्या ९३७ रुग्णवाहिका विविध ठिकाणी सेवारत आहेत.१०८ हा आपत्कालीन क्रमांक डायल केल्यास काही मिनिटांमध्ये रुग्णवाहिका संबंधितांपर्यंत पोहोचते.

अतुल जयस्वाल,
अकोला : आरोग्य विभागाने ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या कंपनीच्या सहकार्याने सुरू केलेली रुग्णवाहिका सेवा कुचकामी ठरत असल्याची टीका होत असली, तरी गत पाच वर्षांत १०८ क्रमांकाची ही सेवा पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमधील तब्बल ३ लाख ६५ हजार १३० रुग्णांसाठी संकटमोचक ठरली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत जलद वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने २०१४ पासून ‘१०८’ ही रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या कंपनीचे सहकार्य घेण्यात आले असून, राज्यभरात आरोग्य सुविधांनी सज्ज असलेल्या ९३७ रुग्णवाहिका विविध ठिकाणी सेवारत आहेत. ही सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संलग्न असून, दूरध्वनीवरून १०८ हा आपत्कालीन क्रमांक डायल केल्यास काही मिनिटांमध्ये रुग्णवाहिका संबंधितांपर्यंत पोहोचते. ग्रामीण भागांमध्ये आरोग्यविषयक सुविधा जलदगतीने पोहोचाव्या, या उद्देशाने सुरू झालेली ही सेवा अनेक रुग्णांसाठी प्राणरक्षक ठरली आहे. अपघातातील जखमी, गर्भवती महिला, हृदयविकाराचा झटका आलेले रुग्ण, विष प्राशन केलेले, आगीत जळालेल्यांना जलदगतीने रुग्णालयांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ही सेवा अवितरणपणे करीत आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये २०१४ ते १२ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत ३ लाख ६५ हजार १३० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतल्याची आकडेवारी आहे.

अपघातग्रस्तांसाठी प्राणरक्षक
अपघातात जखमी झालेल्यांसाठी पहिला तास महत्त्वाचा असतो. या तासाभरात आवश्यक उपचार मिळाल्यास जीव वाचण्याची शक्यता असते. १०८ क्रमांकाची ही सेवा अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत असल्याने त्यांच्यासाठी ती प्राणरक्षक ठरली आहे.

गत पाच वर्षांतील आकडेवारी
जिल्हा लाभार्थी
अकोला ५७,०७०
अमरावती १,०९,६१३
बुलडाणा ७२,८००
वाशिम ४५,७५९
यवतमाळ ७९,८८८
--------------------------------
एकूण ३,६५,१३०

 

Web Title: '108' ambulance service serve 3.5 lakh patients in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.