वांबोरीकरांची झोप उडाली..
By admin | Published: June 27, 2014 11:31 PM2014-06-27T23:31:13+5:302014-06-28T01:11:56+5:30
अहमदनगर : वांबोरी (ता.राहुरी) या ठिकाणी गेल्या शनिवार पासून भयावह परिस्थिती आहे. दररोज रात्री सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ आणि अफवांच्या पिकामुळे वांबोरीकरांच्याझोपा उडल्या आहेत.
अहमदनगर : वांबोरी (ता.राहुरी) या ठिकाणी गेल्या शनिवार पासून भयावह परिस्थिती आहे. दररोज रात्री सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ आणि अफवांच्या पिकामुळे वांबोरीकरांच्याझोपा उडल्या आहेत. गत पाच दिवसांत गावातील चार ठिकाणी चोऱ्या झाल्या असून दोन पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेले आहे. रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त सुरू असली तरी परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
वांबोरी गाव आणि परिसरात असणाऱ्या वाड्या वस्त्यांना चोरट्यांनी आपले लक्ष केले आहे. गत आठवड्यात पहिल्या दिवशी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर गावात रोज रात्री चोर आले, अशी अफवा पसरत आहे. यात काही ठिकाणी चार पेक्षा अधिक तरूणांना पळताना पाहिले असल्याचा दावा करण्यात येत आहे.
वस्तूस्थितीत यात तथ्य असले तरी प्रत्यक्षात या चोरट्यांना पाहण्याची संख्या अत्यंत कमी आहे. काही ठिकाणी दगडे फेकली, घरांच्या कड्या लावल्या, घरा शेजारी अंधारात बसले होते. रात्रीच्या वेळी झाडावर बसलेले होते, रस्ता अडविला, आदी कारणे नागरिक एकमेंकाना सांगताना दिसत आहेत. रात्री ९ पासून अमुक वस्तीकडे चोर दिसले, धावा पळा असा आरडा ओरडा होतो, शेकडो तरूण हातात काठ्या, कुऱ्हाडी, लाकडी दंडूके घेऊन सैरावैरा पळताना दिसत आहे. यामुळे याच गोंधळात चोर असले तरी क्षणात गायब होत आहेत. यामुळे गोंधळाची परिस्थिती कायम आहे.
विशेष म्हणजे गावातील मुस्लीम गल्ली, विठ्ठलवाडी झोपडपट्टी, शासकीय विश्रामगृह परिसर, पुलवाडी, घोडेपीर, पटारे वस्ती या ठिकाणी चोर आले असल्याची चर्चा आहे. मात्र, या ठिकाणी कोणीच सापडलेले नाही. त्याच त्या दररोज उठणाऱ्या अफवांमुळे वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांसह लहान मुलेही रात्रभर झोपत नाहीत. पोलिसांनी वेळीच चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
(प्रतिनिधी)
गेल्या पाच दिवसांपासून वांबोरी परिसरात रात्रीच्या वेळी चोर आल्याचा आरडा-ओरडा होत आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता संयमाने परिस्थितीचा सामना करावा. अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि कृपया पसरवू नका.
- अॅड. सुभाष पाटील, ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषद सदस्य.
वांबोरी येथील चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला आहे. लवकर चोरट्यांना पकडण्यात येईल. रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याचे आदेश दिलेले आहे. घडलेल्या गुन्ह्यांचा आणि चोरीचा तपास लावू.
- सुनीता ठाकरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर.