ऑनलाइन लोकमत
राहुरी (अहमदनगर), दि. 04 - पाथर्डीहून संगमनेर कारखान्याकडे ऊस तोडणी कामगारांना घेऊन जाणा-या ट्रकला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास राहुरी औद्योगिक वसाहतीजवळ अपघात झाला.
या अपघातात ट्रकमधील दोन बैल जागीच ठार झाले तर आठ ऊस तोडणी कामगार जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली़ पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील ऊस तोडणी कामगार कामानिमित्त संगमनेरच्या भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याकडे शुक्रवारी पहाटे एम.एच. ०४, एच ५७०६ या ट्रकमधून जात होते.
या ट्रकमध्ये आठ ऊस तोडणी कामगारांसह गाय, म्हैस, चार बैल आणि संसारोपयोगी साहित्य होते़ हा ट्रक राहुरी औद्योगिक वसाहतीजवळ असताना खड्डा चुकविताना चालकाचा ताबा सुटला व ट्रक उलटला. या अपघातात दोन बैल जागीच ठार झाले तर आठ व्यक्ती जखमी झाल्या़ जखमींमध्ये सखाराम कौठे, त्र्यिंबक भागवत, अशोक उंडे, दादासाहेब भाबड, झुंबरबाई कौठे, संगीता मुंडे, सुरेखा भाबड, नवनाथ उंडे यांचा समावेश आहे़ जखमींवर नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.