रयतेचा सेवक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 02:42 PM2019-08-20T14:42:52+5:302019-08-20T14:43:16+5:30

 रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्व़ अ‍ॅड. रावसाहेब पांडुरंग शिंदे यांनी त्यांच्या ८७ वर्षांच्या जीवन वाटचालीत बहुविध स्वरुपाचे कार्य केले. शैक्षणिक, सामाजिक, न्याय, कृषी आदी क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा मोठा पट दिसून येतो. त्यांच्या लेखन, वाचन, विचार व सामाजिक वाटचालीचा आदर्श आजच्या नव्या पिढीला प्रेरणादायी असाच आहे. 

Servant of the ryot | रयतेचा सेवक 

रयतेचा सेवक 

Next

अहमदनगर : अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांचे कार्य आधी स्वातंत्र्यासाठी आणि नंतर समाजाच्या भल्यासाठी जीवन समर्पित करणारे आहे. त्यांचे  जीवन एक समर्पणाचे उदाहरण आहे. त्यांनी आपल्या ध्यासपर्व या आत्मचरित्रात स्वातंत्र्य आंदोलनाच्या आठवणी सांगितल्या आहेत. बालपणातच संगमनेर येथे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिंदे बोर्डिंगची स्थापना करत त्यांनी शिक्षण कार्याला वाहून घेतले. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी महात्मा गांधी, साने गुरुजी यांचा आदर्श समोर ठेवून १९४२ च्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यासाठी तुरुंगवास भोगला. या आठवणी अंगावर रोमांच निर्माण करतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही शेतकरी, कामगार, आदिवासी, विद्यार्थी, विडी कामगार, भूमिहीन इत्यादींना न्याय मिळाला नाही तेव्हा त्यांचे मोठे बंधू माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे, पी. बी. कडू पाटील, भाऊसाहेब थोरात इत्यादींसह न्याय लढा सुरू केला. त्याकाळच्या सरकारने त्यांच्याबाबत केलेले अपप्रचार व तुरुंगवास याचेही वास्तव चित्र त्यांनी रेखाटले आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली त्यांनी लढे उभारले. कालांतराने या चळवळीतून ते बाहेर पडले. विद्यार्थी दशेपासून त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला वाहून घेतले. 
अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांनी शिक्षण आणि समाज व चित्र आणि चारित्र्य या २००१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांमध्ये आपल्या शैक्षणिक विचारांचा, कार्याचा आदर्शाचा आढावा घेतला आहे. 
अ‍ॅड. शिंदे यांनी १९४० मध्ये राष्ट्र सेवा दलाच्या कार्याला सुरुवात केली. साने गुरुजींशी त्यांचा सतत संपर्क राहिला. सन १९५४ ते १९९१ या काळात त्यांनी श्रीरामपुरात एक निष्णात कायदे तज्ज्ञ म्हणून आपला ठसा उमटविला़ सन १९६० ते १९७५ या काळात ते श्रीरामपूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. १९९९ ते २००८ या काळात त्यांनी दि इंडियन सोसायटीचे उपाध्यक्षपद भूषवले. २००८ ते २०१६ पर्यंत ते अध्यक्षपदी होते. या क्षेत्रातील त्यांचे कार्य विचार व चिंतन त्यांच्या अनेक लेखनात प्रकट झालेले आहेत. १९५१ ते १९५९ हा कालखंड अ‍ॅड. शिंदे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह भ्रमंतीत व कार्यात व्यतित केला. १९७६ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य झाले. १९७८ ते २००८ या तीस वर्षात त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पद म्हणून निरपेक्ष शैक्षणिक सेवा केली.
९ मे २००८ ते २६ जानेवारी २०१५ म्हणजे जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांनी रयतच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. कर्मवीरांच्या कार्याचा, विचारांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी रयत संस्थेत केलेले कार्य फार मौलिक ठरले. श्रीरामपूरच्या रयत शिक्षण संकुलाला त्यांनी आधुनिक वाटचालीची दिशा दिली. संगणक प्रणाली टाटा बीपीओ सेंटरची उभारणी केली. विज्ञान परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षकांत वैज्ञानिक दृष्टी आणि नव्या तंत्रज्ञानाची गोडी निर्माण केली. अ‍ॅड. शिंदे यांच्या शिक्षण आणि समाज व चरित्र आणि चारित्र्य या ग्रंथाचे संपादन तसेच ध्येयासक्त या चरित्र ग्रंथाचे लेखक डॉक्टर र .बा.मंचरकर रावसाहेबांविषयी लिहितात ‘रावसाहेबांचे मन मूल्ययुक्त जीवनाची ओढ असलेले मन आहे. जीवनमूल्यांच्या संरक्षणासाठी आणि संगोपनासाठी त्यांनी आपल्या वाणी, लेखणीची आणि कृतीची शक्ती सतत पणाला लावलेली आहे. समाजाची धारणा त्याचे उद्बोधन आणि परिवर्तन यासाठी रावसाहेब काही मूल्यांचा मोठा आग्रह धरतात. लखलखीत चारित्र्य, श्रमाधिष्ठित ज्ञान व प्रेम लोकहिताची तळमळ, समाजाच्या सुखदु:खाची बांधिलकी, निरोप, नि:स्वार्थी त्याग बुद्धी आणि समर्पणशील सेवावृत्ती ही मूल्ये त्यांना व्यक्ती जीवनात अभिप्रेत आहेत’. डॉ. र. बा. मंचरकर यांनी शिक्षण आणि समाज या ग्रंथातून रावसाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक विचारांचा व व्यक्ती जीवनाचा आढावा घेतला आहे. 
विद्यार्थी जर विज्ञानाची दृष्टी घेऊन वाटचाल करीत असेल तर समाजातील अंधश्रद्धा आणि बुरसटलेली विचारसरणी आपोआपच नामशेष होईल, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले. त्यांची जडणघडण कम्युनिस्ट जाणिवेने झाली असली तरी ते कोणत्याही एकाकी भूमिकेने मर्यादित विचारांचे झाले नाही. जेथे माथा टेकवावा असे वाटते, तेथे सदैव नम्र होत असत. आम्ही साहित्य चळवळीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत असू. महानुभाव व श्रीकृष्ण मंदिरात कार्यक्रम घेत. रावसाहेब आवर्जून श्रीकृष्ण मंदिरात येत असत. महानुभावांचे तत्वज्ञान त्यांना आवडत असे व श्रीकृष्ण जीवन चरित्रावर ते भरभरून बोलत असत. सराला बेटाचे सदगुरु नारायणगिरी महाराज जेव्हा निपाणी वडगाव येथील काशिनाथ गोराणे यांच्या वस्तीवर आले, तेव्हा रावसाहेब व नारायणगिरी महाराज यांच्यात अत्यंत भावपूर्ण असा संवाद झाला. कोणत्याही उपक्रमाचा प्रारंभ झाला तर  आयोजित केलेल्या पूजाविधीला रावसाहेबांनी कधी विरोध केला नाही. श्रद्धा ही डोळस असावी, त्यात निर्मळपणा आणि प्रगतीची वाटचाल असावी, ढोंगीपणा आणि फसवेगिरी यावर मात्र ते कडाडून शब्द प्रहार करीत. एक पुरोगामी व्यक्तिमत्त्व आणि संवेदनशील मनाची जाणीव म्हणून रावसाहेब यांचे वेगळेपण दिसते. रावसाहेबांनी गोरगरिबांवर मनापासून प्रेम केले. कोठे काही उणिवा आणि अप्रामाणिकपणा दिसला की ते खूपच अस्वस्थ होत असत़ माणसाने जीवन निर्मळ व सेवाभावी ठेवले पाहिजे. ज्ञान, शील  याबरोबर सदैव श्रमनिष्ठा जपली पाहिजे असे ते मानत असत़
अ‍ॅड़ रावसाहेब शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यकर्तृत्व बहुआयामी होते़ त्यांच्या लेखनातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा काही भाग आज नजरेसमोर आहे परंतु त्यांच्याबरोबरचे जिवंत अनुभव खूप काही सांगणारे आहेत़ माणूस एक चमत्कारच असतो तो सकारात्मक विचारातून समजून घेतला पाहिजे हेच खरे महत्त्वाचे़

लेखक - प्रा. डॉ. बाबूराव उपाध्ये (प्राध्यापक, कोपरगाव)

Web Title: Servant of the ryot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.