लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : तालुक्यातील गोदावरी नदीला ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरामध्ये नदीकाठच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनामार्फत पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला होता. त्यातील दुसऱ्या टप्यातील तीन कोटींचे अनुदान नुकतेच तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.
कोपरगाव तालुक्यात ऑगस्ट २०१९ ला गोदावरी नदीने रुद्रावतार धारण केला होता. त्यामुळे नदीकाठच्या सर्वच गावात शेतात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी व इतर सर्वच प्रकारच्या पिकांचे पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. या नुकसानीचे तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या सूचनेने तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश काढले होते. या महापुरात सुमारे २ हजार ८३ शेतकऱ्यांच्या १५०१.४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची ६ कोटींच्यावर नुकसान भरपाईच्या रकमेची मागणी केली होती. त्यापोटी पहिल्या टप्यातील ३ कोटींची रक्कम ही तत्काळ देण्यात आली होती. तर उर्वरित ३ कोटींची रक्कम नुकतीच प्राप्त झाली आहे. हे दोन्ही टप्पे मिळून आतापर्यंत साडेपाच कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांचे बँक खाते व सामायिक खाते असलेल्या शेतकऱ्यांची ५० लाख रुपयांच्या रकमेचे वाटप शिल्लक आहे.
............
या नुकसान भरपाईच्या अनुदातील काही शेतकऱ्यांचे उताऱ्यावर एका पेक्षा जास्त नावे आहेत. अशा शेतकऱ्यांनी उताऱ्यावरील कोणा एका व्यक्तीच्या नावावर रक्कम जमा करण्याचे प्रतिज्ञापत्र तयार करून कार्यालयात जमा करावे. तसेच काही शेतकऱ्यांनी बँकेचा खाते नंबर दिलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी तत्काळ नंबर द्यावे, त्यांच्या खात्यावर तत्काळ रक्कम जमा करण्यात येईल.
-योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव.