डाळीचे स्थिर, भाजीपाल्याचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:18 AM2021-07-25T04:18:31+5:302021-07-25T04:18:31+5:30
---------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : चांगला पाऊस आणि लगेच मिळालेल्या उघडीपीमुळे बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ...
----------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : चांगला पाऊस आणि लगेच मिळालेल्या उघडीपीमुळे बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. परिणामी, किरकोळ बाजारातही भाजीपाल्याचे मात्र दर कमी झाले आहेत. ग्राहकांना हा दिलासा असला, तरी शेतकऱ्यांवर मात्र भाव कोसळल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहेत. किराणा मालामध्ये डाळींचे भाव गत महिन्याप्रमाणेच स्थिर आहेत. मात्र, चहा, साबण अशा पॅकेजिंगच्या मालाचे मात्र दर वाढले आहेत.
किराणा मालाचे दर गत महिन्यात चांगलेच वाढले होते. त्यात डाळींचे भाव शंभरीपार गेलेले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला दरवाढ झाल्यानंतर, किराणा मालाच्या दरात फारशी दरवाढ दिसून आली नाही. तूर, मूग, उडीद डाळीचे दर शंभरीपार असले, तरी हे दर महिन्याभरापासून आहेत. सध्याच्या स्थितीत त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. तरीही ही दरवाढ सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली दिसते. खोबरे, तेल, खसखस, बदामाच्या दरात मात्र वाढ झालेली आहे.
--------------
साबण, चहाचे दर वाढले
सर्व प्रकारच्या साबण, पावडर, चहा, खोबरेल तेल अशा प्रकारच्या पॅकेटमध्ये येणाऱ्या सर्व वस्तूंच्या दरात वाढ झालेली दिसून आली आहे. सोयाबीन तेलाच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. खसखस प्रति ५० ग्रॉम ११० रुपयांना झाली आहे. यामध्ये २० रुपयांची वाढ झालेली दिसते.
-------------
डाळीचे दर (प्रतिकिलो)
हरभरा-७५
तूर-११०
मूग-१०६
उडीद-१२०
मसूर-८५
----------------
भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)
बटाटा-२०
कांदा-२५
टोमॅटो-२०
काकडी-२०
कोथिंबीर-१०
पालक-१०
मेथी-२०
दोडके-४०
लिंबू-४०
गवार-६०
-------------------
म्हणून भाजीपाला उतरला
जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे, तसेच आता उघडीपही दिली आहे. भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक झाली आहे. त्यामुळे दर कमी झाले आहेत. यामुळे ग्राहकांचा फायदा होत असला, तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दोन दिवस लॉकडाऊनमुळे बाहेरगावी माल जात नाही. त्यामुळे इथला माल इथेच विकत असल्याने दर कमी झाल्याचे पाइपलाइन रोडवरील विक्रेते शरद बोबडे यांनी सांगितले.
-----------------
म्हणून डाळीचे भाव स्थिर
सोयाबीन तेलाचे भाव सध्या पाच रुपयांनी वाढले आहेत. डाळीचे भाव स्थिर आहेत. त्यात म्हणावी अशी सध्या वाढ नाही. मुगाची नवीन आवक आता सुरू होईल, त्यामुळे मूगडाळीचे दर कमी झाले आहेत. किराणा मालाचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांनी मात्र या महिन्यात पाच ते दहा रुपयांनी विक्री किंमत वाढविली आहे. कदाचित त्यांच्या कंपन्यांमध्ये कोरोनामुळे कामगारांची समस्या असण्याची शक्यता असू शकते. धान्याचा हंगाम सुरू झाला की, डाळींचे दर कमी होतात.
- संजय साखरे, किराणा मालाचे व्यापारी
------------
सर्वसामान्यांचे मात्र हाल..........(कोट)
कोरोना काळात आधीच अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यात महागाईने जनता त्रस्त आहे. या महिन्यात किराणा मालाचे भाव स्थिर असले, तरी मुळात ते वाढलेलेच आहेत. त्यामुळे हे दर सामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत.
------
भाजीपील्याचे दर कमी झाले असले, तरी प्रत्येक भाजी २० ते ३० रुपये किलो आहे. ज्यांना काम नाही, रोजगार नाही, त्यांच्यासाठी हे दरही आवाक्याबाहेरचे आहेत. सामान्य माणसाला हे दर अजिबात परवडणारे नाहीत. किरकोळ बाजारात भाजीपाला तसा महागच आहे.
-
---------