टेस्टअभावी ग्रामीण भागात वाढताहेत रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:19 AM2021-03-06T04:19:30+5:302021-03-06T04:19:30+5:30
आरटीपीसीआर टेस्ट सुरू होती. मात्र, ही टेस्ट आता तालुक्याच्या ठिकाणी केली जाते. ज्या रुग्णांना प्राथमिक लक्षणे दिसत असूनसुद्धा अंतर ...
आरटीपीसीआर टेस्ट सुरू होती. मात्र, ही टेस्ट आता तालुक्याच्या ठिकाणी केली जाते. ज्या रुग्णांना प्राथमिक लक्षणे दिसत असूनसुद्धा अंतर लांब असल्याने रॅपीड अँटीजेन व आरटीपीसीआर टेस्टअभावी ग्रामीण भागातील रुग्ण तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे.
संगमनेर तालुक्यातील पठारभागात घारगाव, बोटा व जवळे बाळेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सुरुवातीला शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेस्ट सुरू करण्यात आल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याचे पाहून आरोग्य विभागाने रॅपीड अँटीजेन टेस्ट बंद केल्या. अलीकडे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रॅपीड अँटीजेन व आरटीपीसीआर टेस्ट होत नसल्याने रुग्णांना थेट तालुक्याच्या ठिकाणी पन्नास ते साठ किलोमीटर ग्रामीण रुग्णालयात टेस्टसाठी जावे लागत असल्याने रुग्ण टाळाटाळ करतात. यामुळे या रुग्णांचा इतरांशी संपर्क येऊन रुग्ण वाढण्याची भीती आहे.
यापूर्वी रुग्णाला जर प्राथमिक लक्षणे वाटली तर रॅपीड अँटीजेन टेस्ट केल्याने १५ मिनिटांत अहवाल येऊन रुग्णाचे विलगीकरण केले जायचे व कुटुंबातील इतर व्यक्तीची टेस्ट त्वरित होत असल्याने कोरोनाचा संसर्ग टाळता येत होता. मात्र, आता टेस्ट तालुक्याच्या ठिकाणी होत असल्याने त्याचे अहवाल येण्यास दोन दिवस जातात. तोपर्यंत रुग्ण अनेकांच्या संपर्कात येत असल्याने कोरोना रुग्णांमध्ये नक्कीच वाढ होण्यास मदत होत आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुन्हा रॅपीड अँटीजेन टेस्ट सुरू करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
..............
रॅपिड अँटीजेन टेस्ट किट शासनस्तरावरून बंद करण्यात आल्या असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आरटीपीसीआर टेस्ट तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात सुरू आहेत. ग्रामीण भागात दररोज टेस्ट कमी असतात तसेच यासाठी दोन ते तीन कर्मचारी दररोज काम करतात. तसेच हे स्वॅब दररोज ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागते. तेथून ते नगरला पाठविले जाते. कर्मचारीसंख्या कमी असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. रुग्णाची रॅपिड अँटीजेन टेस्ट एकच कर्मचारी करू शकतो, म्हणून रॅपिड किटची मागणी होत आहे.