सकाळी स्त्राव घेतला की सायंकाळी नगरला पोहाेचतो. तेथे नंबरनुसार चाचणी होते आणि तिसऱ्या दिवशी उशिरा अहवाल अकोलेत येतो. रुग्णपर्यंत अहवाल पोहोचण्यास चौथा दिवस उजाडतो. तोपर्यंत बाधित रुग्ण गावात, बाजारपेठेत फिरत राहतो. रुग्णवाढीचे हे एक प्रमुख कारण असून आरटीपीसीआर चाचणी यंत्रणा तालुका स्तरावर उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे.
दोन तीन आठवड्यापूर्वी नगरवरुन रिपोर्ट यायला पाच-सहा दिवस लागत होते. आता तीन दिवसात रिपोर्ट येतात. पण सुट्टी आडवी आली की अहवाल दिरंगाईने प्राप्त होतात.
चाचणीसाठी स्त्राव घेतल्यानंतर संबंधिताच्या हातावर शिक्का मारायचा व त्यास जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षात ठेवायचे, असा प्रस्ताव आला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू दिसत नाही. कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीच्या चाचण्या वाढवल्यास संसर्ग कमी होईल आणि वेळत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.