शेतीला पाणी देण्यावरून एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:21 AM2021-04-08T04:21:55+5:302021-04-08T04:21:55+5:30
शेतीला पाणी देण्याच्या कारणावरून सख्या भावाने व पुतण्याने ज्ञानेश्वर आढाव यांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी खोऱ्याने मारहाण करून जिवे ठार ...
शेतीला पाणी देण्याच्या कारणावरून सख्या भावाने व पुतण्याने ज्ञानेश्वर आढाव यांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी खोऱ्याने मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना ६ एप्रिल रोजी राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दत्तात्रय पुंजाहरी आढाव यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे फिर्यादी दत्तात्रय आढाव यांचे मयत भाऊ ज्ञानेश्वर पुंजाहरी आढाव यांना फिर्यादीचे शेतातील बोरवेलचे पाणी त्यांच्या शेतात घेऊन जायचे होते. त्यासाठी ज्ञानेश्वर आढाव हे आरोपी विष्णू पुंजाहरी आढाव याच्या शेतातून पाईप जोडीत होते. यावेळी आरोपी विष्णू पुंजाहरी आढाव, प्रतीक विष्णू आढाव हे त्या ठिकाणी आले. तू आमचे शेतातून पाईप जोडू नको. असे म्हणून यातील त्यांनी मयत ज्ञानेश्वर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडके असलेल्या लोखंडी खोऱ्याने व लाथाबुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली. यावेळी ज्ञानेश्वर आढाव यांना तातडीने अहमदनगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी राहुरी पोलिसात विष्णू पुंजाहरी आढाव, प्रतीक विष्णू आढाव या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करीत आहेत.