धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी ‘मिशन माणुसकी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:21 AM2021-01-25T04:21:54+5:302021-01-25T04:21:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जगभरात अनेक देशांत धर्मांध शक्तींची सत्ता लोकांवर लादली जात आहे. या धर्मांध सत्ताधिकाऱ्यांनी मानवी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जगभरात अनेक देशांत धर्मांध शक्तींची सत्ता लोकांवर लादली जात आहे. या धर्मांध सत्ताधिकाऱ्यांनी मानवी मुल्यांचा विनाश आरंभला आहे. परिणामी माणसांचे माणसांपासून अलगीकरण करण्याची धूर्त खेळी सत्ताधाऱ्यांकडून खेळली जात आहे. त्यामुळे या धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी ‘मिशन माणुसकी’ अभियान राबवून माणसात माणूसपण पेरणारी माणुसकीची शाळा राज्यात सुरु केली आहे. त्यासाठी १०२ शिक्षक राज्यभरात शिबिरे घेणार असून, लोकांना माणूसपणाची शिकवण दिली जाणार आहे, असे लोकशाहीर संभाजी भगत यांनी सांगितले.
कोरोनानंतर नगरमध्ये रविवारी (दि. २४) माणुसकीची कार्याशाळा झाली. यानिमित्ताने भगत यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या जगभरात धर्मांध शक्ती सत्तेवर आहेत. त्यांच्याकडून मानवी मुल्यांचे अध:पतन सुरु आहे. माणूस माणसापासून तुटत असून, हे धर्मांध सत्ताधारी संघटित होत आहेत. त्यांनी संघटित होऊन मानवी मुल्यांचा ऱ्हास करुन लोकांवर विलगीकरणाची व्यवस्था लादली आहे. मानवी मूल्य पुन्हा लोकांमध्ये रुजवून लोकांनी एकमेकांकडे माणूस म्हणून पाहायला शिकले पाहिजे, मानवतावादी दृष्टीकोन वाढीस लागला पाहिजे, यासाठी मिशन माणुसकी अंतर्गत माणुसकीची शाळा राज्यभर सुरु करण्यात आली आहे, असे भगत यांनी सांगितले.
...................
मानवी मूल्य शिकवणार
राज्यभरात १०२ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. हे शिक्षक विविध शिबिरांच्या माध्यमातून लोकांना मानवी मुल्यांची शिकवण देतील. लहान मुलांना गाणी, कविता, खेळ विविध स्पर्धा अशा अनेक माध्यमातून मानवी मूल्य शिकवली जातील. विविध शिबिरांमधून मानवी मूल्य रुजविण्यासाठी एक कार्यक्रम आखण्यात आला आहे. माणुसकीच्या शाळेत तो सर्वांना शिकवला जाणार आहे. ही शाळा सर्वांसाठी मोफत असून, कोणाकडून एक रुपयाही घेतला जात नाही. पोरांपासून थोरांपर्यंत तसेच संपूर्ण कुटुंबही या शाळेत सहभागी होऊ शकते, असे भगत यांनी सांगितले.
...............
मुंबईतून झाली सुरुवात
दीड वर्षापूर्वी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये माणुसकीच्या शाळेला प्रारंभ झाला. मात्र, पुढे कोरानानंतर ही शाळा बंद झाली. कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने ही शाळा वाढली. मारुती शेरकर, डॉ. प्रा. प्रतिभा जाधव, शिवाजी नाईकवाडी, प्रवीण जठार असे अनेक लेखक, शिक्षक, मानवतावादी कार्यकर्ते ‘मिशन माणुसकी’सोबत जोडले आहेत. कोणताही राजकीय पक्ष, संघटना टाळून ही माणुसकीची शाळा चालवली जाणार आहे, असे भगत म्हणाले.