Maharashtra Gram Panchayat: ३० वर्षांनंतर निवडणूक होणाऱ्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता
By मुकेश चव्हाण | Published: January 18, 2021 09:58 AM2021-01-18T09:58:06+5:302021-01-18T10:06:18+5:30
हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे
केडगाव (अहमदनगर) : ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशाला दिशादर्शक असणारं 'आदर्श गाव हिवरेबाजार' येथे ३० वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. या हिवरेबाजार ग्रामपंचायत निकालाचा सध्या हाती आलेल्या आकडेवारीनूसार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाला आहे.
हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने सातही जागांवर विजय मिळवलेला आहे. आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये तब्बल ३० वर्षांनंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले.
मतदानाच्या दिवशी मतदारांनी सकाळपासूनच यासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी निवडणूक बिनविरोध होऊ शकली नसली, तरी निवडणूक कशी असावी, याचाही आदर्श घालून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले होते.गावातील किशोर संबळे यांनी पुढाकार घेऊन पोपटराव पवार यांच्याविरोधात पॅनल उभा केल्याने येथील निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे यावेळी मतदान झाले. ग्रामस्थांनी उत्साहात त्यामध्ये भाग घेतला. अन्य निवडणुका सोडल्या, तर 'ईव्हीएम' आल्यानंतर झालेली ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक ठरली.
दरम्यान पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे १९९० पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही. मात्र, यंदा प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
कोणत्याच पक्षाचे बूथ न लागणारे गाव
आदर्श गाव हिवरे बाजारचा बिनविरोध निवडणुकीचा कानमंत्र फक्त गावातीलच नव्हे, तर राज्यस्तरीय व राष्ट्रीय निवडणुकीत पाळला जात होता. गावकरी एकोप्याने गावातील निवडणूक हाताळत होते. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत या गावात कधीच कोणत्या पक्षाचे बूथ लागले नाही किंवा पोलिंग एजन्ट नव्हते. देशातील हे दुर्मीळ उदाहरण असून गावकऱ्यांना प्रथमच निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे.
12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणीला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.