दलित-श्रमिकांचे साहित्यिक नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 02:27 PM2019-08-20T14:27:19+5:302019-08-20T14:27:49+5:30

लाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी) सरचिटणीस, महाराष्ट्रातील ग्रामीण कामगार कष्टकºयांचे नेते, ग्रामीण श्रमिक व नंतर दैनिक श्रमिक विचारचे संपादक, लोकसाहित्याचे अभ्यासक व कष्टकरी साहित्यकार म्हणून कॉम्रेड भास्करराव जाधव यांची महाराष्ट्राला ओळख आहे. कामगार-कष्टकºयांचे राज्य हेच एकमेव स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. शासकीय संस्थांमधील कर्मचाºयांच्या संघटनांची बांधणी करून त्यांनी कष्टकरी-शेतकरी समाजाला न्याय दिला. संपादक, गीतकार, नाट्यलेखक, श्रमिकांचा नेता, विचारवंत असे बहुविध पैलू भास्करराव यांच्या व्यक्तिमत्त्वात पहायला मिळतात.

Literary leader of Dalit-workers | दलित-श्रमिकांचे साहित्यिक नेते

दलित-श्रमिकांचे साहित्यिक नेते

Next

अहमदनगर : दिवंगत कॉम्रेड भास्करराव जाधव यांचा जन्म ५ जून १९३३ सालचा. १९३० हे काळाराम मंदिर सत्याग्रहाचे वर्ष. त्यात त्यांच्या वडिलांनी भाग घेतला होता. त्यात त्यांना शिक्षाही झाली होती. मुखेडच्या पांडव प्रताप सत्याग्रहातही त्यांचा सहभाग होता. ते मराठी चौथीत असताना ‘भीम हवा’ असं गाणं जोडलं होतं. त्यावेळी त्यांच्या घरी, आजोळी, सर्वत्र चळवळीचेच वातावरण होते. त्यांच्या वडिलांनी कोपरगाव तालुक्यातील रामवाडी येथे साखर कंपनीच्या शेतीवर मुकादम म्हणून नोकरी केली. तेथून कोपरगावला दररोज ७-८ मैल पायी जाऊन त्यांनी तेथील आपले माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अस्पृश्य मुलांना कोपºयात बसून शिकावे लागे. पेन्सील, शाई, वह्या, पुस्तके यासाठी पैसे नसत. दुकानदाराला बाजरीच्या, कडब्याच्या पेंढ्या देऊन हे घ्यावे लागे. पुढे त्यांनी मनमाड येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी चालविलेल्या डॉ. आंबेडकर विद्यालय वसतिगृहात प्रवेश घेतला. वसतिगृहांना अनुदान नसल्यामुळे जेवणाची आबाळ होई. उच्च शिक्षण मुंबई येथे वेगवेगळ्या नातेवाईकांकडे राहून तसेच नोकरी करीत पूर्ण केले.  टेलिफोन एक्सचेंजमध्ये, १९५१ ची जनगणना, सेल्स टॅक्स विभाग, स्टील अ‍ॅण्ड सिमेंट फॅक्टरीत त्यांनी नोकरी केली. दरम्यानच्या काळात त्यांचे वाचन मोठ्या प्रमाणात चालू होते. अशातच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले दलित साहित्यिक प्रा.केशव मेश्राम यांचे काका श्रावण मेश्राम यांचा त्यांचेशी परिचय झाला. ते कम्युनिस्ट विचाराचे व लाल निशाण पक्षाची पूर्व राजकीय नवजीवन संघटना त्यांचेशी संबंधित होते. ललित व कम्युनिस्ट साहित्याचे वाचन चालू असतांनाच्या काळात कॉ. अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर कॉ. गव्हाणकर यांच्याशी ओळख व नंतर बरीच जवळीक झाली. अण्णा भाऊंच्या चिरागनगरमधील घरी अनेकदा जाणे-येणे व जेवणे वाढले. शाहीर म्हणून अण्णा भाऊंना मोठी प्रतिष्ठा व प्रसिद्धी होती. पण त्यांचे अक्षर अगदी गिचमिड असे. त्याची मुद्रण प्रत करण्याचे काम कॉ. भास्करराव करीत. ‘किर्लोस्कर’ सारखी मासिके त्यांच्या कथा साभार परत करीत. पण कम्युनिस्ट पक्षाच्या ‘युगांतर’ साप्ताहिकात त्या प्रसिद्ध होत. नंतर या कथांच्या हिंदी व इतर भारतीय तसेच विदेशी भाषात भाषांतरे होत असत. त्यानंतर मात्र प्रस्थापित साहित्याला जाग आली. याच काळात मुंबईत असतांना कॉ. बाबूराव बागुलांशीही संबंध आला व तो कौटुंबिक संबंधापर्यंत नंतर वृद्धिंगत झाला. पुढे मुंबईतील नोकरीचा राजीनामा दिला व पक्ष कार्यासाठी अहमदनगरला स्थायिक झाले.
भास्करराव एका दलित शेतमजूर कुटुंबातून आलेले. त्या काळात ग्रॅज्युएट असल्याने सहज शासकीय नोकरीत बढत्या मिळवून मोठे अधिकारी झाले असते. पण शासकीय नोकरी करण्याचा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. त्यांनी त्याकाळात चालू असलेल्या दलित व कामगार चळवळीच्या पार्श्वभूमीवर चळवळीतच पूर्णवेळ काम करण्याचा निश्चय केला. सुरुवातीला त्यांनी ‘नवजीवन’ संघटनेत, पुढे त्याचेच विकसित स्वरूप झालेल्या ‘कामगार किसान पक्षात’ व त्याहीपुढे ‘लाल निशाण पक्षात’, पूर्णवेळ काम केले. पुढे ‘लाल निशाण पक्ष (लेनिनवादी)’चे ते सरचिटणीसही झाले. त्या पदावर असतांनाच १८ जून १९९९ रोजी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. 
देशात कामगार, कष्टकºयांचे राज्य आणायचे असेल तर भूमिहीन शेतमजूर व गरीब कष्टकरी शेतकरी यांना संघटित करणे आवश्यक आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणून ग्रामीण भागातील शासकीय क्षेत्रातील बी. अ‍ॅण्ड सी, जिल्हा परिषदेचे मैल कामगार, पाटबंधारे खात्यातील कामगार, गांव कोतवाल इत्यादी विभागात काम करणाºया नोकरदार वर्गाच्या त्यांनी प्रथम संघटना बांधल्या. हा पसारा नंतर ग्रामपंचायत कामगार, साखर कामगार इत्यादी विभागापर्यंत वाढत गेला. मुख्यत: मराठवाडा व विदर्भात या कामगारांच्या संघटना बांधून त्यांना लाभ मिळवून देण्याचे व त्यांच्या मार्फतीने शेतमजुरांपर्यंत पोहोचण्याचे काम भास्कररावांनी केले. या कामानिमित्त त्यांचा संपूर्ण मराठवाडाभर सतत वावर होता. या फिरस्तीच्या वेळी ते ज्या ज्या ठिकाणी जात होते तेथील विविध पुरोगामी, परिवर्तनवादी, साहित्यिक क्षेत्रात काम करणाºया अनेक कार्यकर्त्यांच्या ते भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा करीत असत. यातून त्यांचा संपूर्ण राज्यभर आपुलकीचा गोतावळा निर्माण झाला होता. प्रा. रावसाहेब कसबे, शाहीर दिनकर साळवे, लहू कानडे यांच्यासारखे लोक त्यांच्या मित्र परिवारात होते.
नगर शहरातील त्यावेळच्या नगरपालिका कामगारांतही त्यांनी लढाऊ संघटना उभारली होती. नगरपालिका कामगार युनियनच्या सहकार्याने नगर जिल्ह्यातील सर्व कामगारांना उपयोगाचे व्हावे म्हणून त्यांनी मोठे कार्यालय उभारले आहे. तेव्हापासून ते जिल्ह्यातील चळवळीचे केंद्र झाले आहे.
१९७७ साली राज्य सरकारी कर्मचाºयांचा ५४ दिवसांचा ऐतिहासिक संप झाला त्यावेळी वर उल्लेख केलेल्या गांव कोतवालासह सर्वच निमशासकीय कर्मचाºयांना संपात उतरविल्यामुळे या लढ्याला एक वेगळेच परिमाण मिळाले. हा सर्वात तळाचा विभाग असल्याने या संपाला सामाजिक पाठिंबा व समर्थनही मिळाले. या लढ्यातूनच पुढे समन्वय समितीचे नेते र. ग. कर्णिक, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे नेते कॉ. अशोक थूल यांच्यासारख्या नेत्यांशी असलेले संबंध घनिष्ट झाले. 
ग्रामीण भागात काम करीत असतांना त्यांच्यातील साहित्यिक गप्प बसलेला नव्हता. ग्रामीण कामगार, कष्टकरी स्त्री पुरुषांचे  जीवन समजून घेऊन त्यांच्या हालअपेष्टांना त्यांनी आपल्या क्रांतिगीतातून वाट करून दिली होती. आजही महिलांचे कोणतेही आंदोलन चालू असले तर तेथे... 
‘आग चहू बाजूंनी, 
लागली संसारा, 
सवालाचा जबाब दे रं, 
देशाच्या सरकारा’
हे गीत त्यांच्या भावनांना वाट करून देते. ग्रामीण भागात स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेल्या सधन शेतकरी वर्गाची निर्मिती ध्यानात घेऊन त्यांच्या इतर कष्टकरी  विभागाशी येऊ घातलेल्या शत्रूपूर्ण संबंधांची नोंद त्यांनी ‘सधनाची संगत सोड रे’ या वगनाट्यात घेतली आहे.  निवडणुकांतून सरकार बदलते पण बड्यांची सत्ता बदलत नाही, ही लोकशाही कष्टकºयांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणू शकत नाही हा विचार त्यांनी ग्रामीण जनतेला समजेल अशा लोकप्रिय पध्दतीने आपल्या ‘जयवंताची निवडणूक, लोकशाहीचा दरबार अशा नाट्यातून मांडला आहे. या दोन्ही वगनाट्याचे शेकडो प्रयोग लाल निशाण पक्षाच्या कलापथकाने कॉ. पोपट देशमुख, कॉ. गुलाब देशमुख, कॉ. गंगूबाई व इतर  ग्रामीण कार्यकर्त्यातून तयार झालेल्या कलापथकाच्या माध्यमातून त्यावेळी ग्रामीण भागातून केलेले आहेत. दलित चळवळीशी  संबंध म्हणून त्यांनी वामनदादा कर्डक यांच्या गीतांचे संकलन करून ‘हे गीत वामनाचे’ या कविता संग्रहाचे संपादनही केले आहे. त्यांनी कष्टकºयांंच्या लढ्यात अजरामर ठरतील, अशी क्रांतिगीते लिहिली आहेत व ही गीते ग्रामीण भागातील कष्टकºयांनी मुखोद्गत केली आहेत. एवढे ते त्यांच्या जीवनाशी समरस झाले होते. त्यांनी  आपल्या गीतातून कष्टकºयांच्या वाईट परिस्थितीचे केवळ वर्णन केले नाही तर त्यात बदल कसा करता येईल याचाही विचार  आपल्या वगनाट्य व क्रांतिगीतातून मांडलेला आहे.
नवीन होतकरू कवी किंवा लेखक आपल्या लेखणीतून परिवर्तनाचा श्वास टाकत आहेत, असे भास्कररावांना वाटले की ते जाणीवपूर्वक त्याला प्रोत्साहन द्यायचे. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये संयत असा उपरोध होता. तो उपरोध  विनोदाच्या अंगाने न जाता विद्रोहाच्या अंगाने जातो ही मराठी साहित्यामध्ये दुर्मीळतेनेच जाणवणारी बाब आहे. माणसांवर लोभ ही त्यांच्या बाबतीत सर्वांनाच विलोभनीय वाटणारी बाब होती. संपूर्ण महाराष्ट्रातील चळवळी एक-दुसºयाला समजाव्यात म्हणून त्यांनी १९७० ते १९७५ पर्यंत ‘ग्रामीण श्रमिक’ नावाचे पाक्षिक चालविले होते. नंतर म. रा. कामगार-कर्मचारी व ग्रामीण श्रमिक परिषदेच्यावतीने १९७९ सालापासून पुणे येथून ‘दैनिक श्रमिक विचार’ चालू केले होते. या दैनिकाची सर्व जबाबदारी संपादक म्हणून भास्करराव यांनी स्वीकारली होती. दलित-श्रमिक चळवळीची एकजूट व्हावी असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहकार्याने लाल निशाण पक्ष (लेनिनवादी), भाकप, माकप व शेकाप यांची मिळून एक राज्यव्यापी ‘श्रमिक संघर्ष समिती’ स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. या समितीच्या वतीने औरंगाबाद, कोपरगांव, श्रीरामपूर, धुळे, पुणे इत्यादी ठिकाणी महाराष्ट्रभर दलित-श्रमिकांचे संयुक्त मेळावेही संघटित केले होते. 

कॉ. भीमराव बनसोड (मार्क्सवादी ज्येष्ठ कार्यकर्ते, औरंगाबाद) 

Web Title: Literary leader of Dalit-workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.