श्रीगोंदा : १३ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या भिंगाण येथील वैभव बापू पारखे (वय ५) या चिमुरड्याचा मृतदेह सोमवारी सकाळी भिंगाण शिवारात काटेरी झुडपात सापडला. संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.वैभव पारखे याचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या स्थितीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हे सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले.वैभव हा गायब झाल्यानंतर वैभवचे वडील बापू पारखे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबविली़ पण यश आले नव्हते. वैभवचे अपहरण संपत्तीच्या वादातून की नरबळीसाठी झाले, याबाबत पोलिसांचा शोध सुरु होता. पोलिसांना वैभवचा किंवा आरोपींचा शोध घेण्यात यश आले नव्हते. अखेरीस बापू पारखे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या काटेरी झुडपात वैभवची पॅन्ट व डोक्याची कवटी गुराख्यांनी पाहिली आणि पोलीसांना खबर दिली. वैभवचा खून करून खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एखाद्या खड्यात पुरला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वैभव पारखे या चिमुरड्याचा खून झाला हे प्रकरण अतिशय नाजूक आहे़ त्यामुळे वैभवची आम्ही डीएनए चाचणी करणार आहे़ खुन कशा पद्धतीने करण्यात आला याचा छडा वैद्यकिय अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल़ आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल़-बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा