तिसगाव : खावटी कर्ज योजनेचे या सरकारने खावटी अनुदान असे सुधारित रूपांतर केले. कर्जाची परतफेड असते. मात्र अनुदान संकटकाळात उभारीसाठी दिलेली मदत असते. हा दोन्ही सरकारच्या कामातील फरक आहे, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील आडगाव व शिरापूर येथे शुक्रवारी आदिवासी बांधवांना खावटी अनुदान योजनेंतर्गत नैमित्तिक किराणा मालाचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सरपंच काशिनाथ लवांडे, आदिनाथ सोलाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, शिवसेना नेते रफिक शेख, रोहिदास कर्डिले, जालिंदर वामन, माणिकराव लोंढे, बाबासाहेब बुधवंत आदी व्यासपीठावर होते. वसुली अभावी महावितरण, तर महामारीच्या संकटाने जनता अडचणीत आहे. वसुली सक्तीची असल्याची भावना होते. मात्र वीजबिलांच्या वसुलीतील तेहतीस टक्के रक्कम त्याच गावातील विजेची देखभाल दुरुस्तीवर खर्च करण्याचे सरकारचे धोरणही लक्षात घ्यायला हवे, असे सांगून मंत्री तनपुरे म्हणाले, खावटी योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले. निकषांवर फारसे बोट न ठेवता, स्थळ पाहणी व वास्तवतेचे निरीक्षण करून वंचित व गरजूंना सामावून घेतले. हा प्रवाही कृतीभावही आघाडी सरकार जपत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रकल्प समन्वयक सुनील खेडकर यांनी प्रास्ताविक केले. नितीन लोमटे यांनी आभार मानले. मनसेचे राज्य उपाध्यक्ष संजय पाखरे, किरण कराड, राजेंद्र म्हस्के, सुनील लवांडे, नितीन लवांडे, सुनील पुंड, सुरेश बर्फे, बबनराव बुधवंत, अजय पाठक, देवा झरेकर, राम शेलार, स्वीय सहाय्यक विजय टापरे, नारायण नजन आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते.