ऊस तोडणीसाठी एकरी पाच हजारांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:26 AM2021-02-26T04:26:51+5:302021-02-26T04:26:51+5:30
भेंडा : नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांकडून ऊस तोडणीसाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली जात आहे. एकरी पाच ...
भेंडा : नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांकडून ऊस तोडणीसाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली जात आहे. एकरी पाच हजार रुपये घेतले जातात. शिवाय जेवणही द्यावे लगाते. अनेकदा पैसे देऊनही मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
नेवासा तालुक्याला मुळा, भंडारदरा धरणाचे पाणी मिळते. जायकवाडी धरण जलाशय फुगवट्याचा लाभ तालुक्याला मिळतो. यामुळे तालुक्याची ओळख उसाचे आगार अशी झाली आहे.
शेतकरी उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. शेतकऱ्यांनी पिकविलेला ऊस वेळेत तुटून साखर कारखान्याला गेल्यास त्यांना पैसे मिळतील व साखर कारखान्याला फायदा होईल. साखर कारखानदारीचा गळीत हंगाम सुरू होऊन सरासरी तीन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु, अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा आहे.
सद्या ऊस तोडणीसाठी तालुक्यात मुळा, ज्ञानेश्वर, संगमनेर, कुकडी, गंगामाई, वृद्धेश्वर, यूटेक, अशोक यासह इतर कारखान्यांच्या टोळ्या ऊस तोडणी करतात. शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी शेतकी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. आता ऊस तोडणीसाठी मजुरांकडून एकरी ४ ते ५ हजार रुपये मागणी केली जाते. टायर गाडीस प्रत्येक खेपेला दोनशे रुपये द्यावे लागतात. यांत्रिक तोडणीसाठी पैसे व जेवणाची व्यवस्था करावी लागते. पैसे दिल्याशिवाय ऊस तोडणी मजूर ऊस तोडणी करत नाहीत. यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत. विहिरीला पाणी कमी झाले. पैसे दिल्याशिवाय उसाचे तोडणी होत नाही. साखर कारखाना व्यवस्थापनाने योग्य कारवाई करावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत.
-----
हंगाम सुरू होऊन झाली तीन महिने..
बारा महिने पूर्ण होऊनही उसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. ऊस तुटून गेल्यानंतर गहू, हरभऱ्याचे पीक घेता येईल. असे आतापर्यंत शेतकऱ्यांना वाटत होते. आता तेही शक्य होणार नाही, असे शेतकरी सांगतात.