अहमदनगर- निसर्ग चक्रीवादळाचा नगर जिल्ह्यात काही परिणाम तर होणार नाही ना, असे चिंतेचे ढग दाटून आले आहेत. आकाशही सकाळपासून ढगाच्छादित आहे. वातावरणात गारठा असून अधूनमधून रिमझिम सुरू आहे. वाºयाचही वेग नगर जिल्ह्यात वाढला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा स्पर्श पुणे आणि नाशिक जिल्ह्याला होणार असल्याने नगर जिल्ह्यातही त्याचे परिणाम होऊ शकतात. वादळी वारा, जोरदार पाऊस होऊ शकतो. दुपारी चारनंतर जोरदार पावसाची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे.दरम्यान हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिल्याने दोन दिवसांपासूनच प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी रात्री नगर जिल्ह्यात जोराचा पाऊस झाला. हा पाऊस पहाटेपर्यंत होता. बुधवारी सकाळपासुन हलक्या पावसाला सुरवात झाली. ढगाळ हवामान आणि हवेत गारवा आहे. वारेही चांगलेच आहे. महाराष्ट्राच्या किनारपटटीवर एक वाजता वादळ धडकणार आहे. हे वादळ पुढे सरकल्यानंतर त्याचा नगर जिल्ह्याला काय परिणाम होणार, याची चिंताही नगर जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे. दरम्यान दुपारी साडेबारावाजता वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
चक्रीवादळाच्या चिंतेचे अहमदनगर जिल्ह्यावरही ढग, सकाळपासून रिमझिम, वाºयाचा जोरही वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:49 PM