कुकडीच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढा उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:22 AM2021-05-18T04:22:51+5:302021-05-18T04:22:51+5:30
निघोज/जवळे : पारनेर तालुक्यातील १४ गावांतील शेतकऱ्यांशी विचारविनिमय करून बिगर राजकीय पारनेर तालुका पाणी संघर्ष समिती स्थापन करणार आहोत. ...
निघोज/जवळे : पारनेर तालुक्यातील १४ गावांतील शेतकऱ्यांशी विचारविनिमय करून बिगर राजकीय पारनेर तालुका पाणी संघर्ष समिती स्थापन करणार आहोत. या समितीच्या माध्यमातून ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून कुकडी हक्काच्या पाण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन न्यायालयीन लढा उभारणार आहोत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांनी दिली.
निघोज येथे पारनेर तालुक्यातील १४ गावांतील कुकडी पाणी लाभधारकांची बैठक नुकतीच झाली, यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील शेतकऱ्यांवर कुकडी कालव्याच्या पाण्याबाबत नेहमीच अन्याय होत आहे. यामुळे दरवर्षी फळबागा, ऊस व जनावरांचा चारा जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. वर्षानुवर्षे पुणे जिल्ह्यातील मातब्बर नेते नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, संदीप पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, माजी सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, प्रा. ज्ञानेश्वर कवाद, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, कैलाश शेळके, संतोष खोडदे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ, शंकर गुंड, पांडुरंग कृपा पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लंके, सुनील वराळ, रोहिदास लामखडे, मंगेश लाळगे, गोरख पठारे, वसंत ढवण, गोरख ढवण यांनी चर्चेत सहभाग घेतला. कुकडीच्या पाण्याबाबत सध्या पारनेर तालुक्यातील गावागावात बैठका सुरू आहेत.
----
१७ निघोज घावटे
निघोज येथे कुकडीच्या पाण्याबाबत बैठक झाली.