अहमदनगर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण संचार करणाऱ्या नागरिकांची आता अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी संध्याकाळी दिले.
अत्यावशक्य सेवेच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची जिल्ह्यात संख्या वाढली आहे, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसते. कोरोना चाचणी करणाऱ्या पथकासोबत एक पोलीस पथकही असणार आहे. पोलीस पथकासोबत वेळेत चाचणी करणारे मनुष्यबळ आणि आवश्यक साधन सामग्री देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला व पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
कोरोनेला प्रतिबंध करण्यासाठी व विनाकारण संचार करणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन चेक पॉइंट उभारण्यात येणार आहेत. हे चेक पॉइंट गर्दीच्या ठिकाणी असणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी विनाकारण आढळून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवालही आरोग्य यंत्रणा पोर्टलवर अपलोड करणार आहे. त्यामुळे किती नागरिक विनाकारण फिरत आहेत, याची माहिती प्रशासनाला होणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात सुरू होणार आहे.