अहमदनगर : राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी दहा डोस प्राप्त झाले असून, ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी दिली जाणारी लस गुरुवारी संपली. त्यामुळे सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच फक्त कोरोनावरील लस देण्यात येत आहे.
कोरोनावरील लस ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना देण्यात येत होती. राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय जाहीर केला असून, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी महापालिकेला १ मे रोजी १० हजार डोस वितरीत केले आहेत. महापालिकेच्या सहा आरोग्य केंद्रांमध्ये ही लस दिली जात आहे. परंतु, ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना देण्यासाठी महापालिकेकडे लस शिल्लक नाही. लसीचा तुटवडा असल्याने महापालिकेने ४५ ते ६० या वयोगटातील नागरिकांना पहिला डोस देणे बंद केले असून, या वयोगटातील नागरिकांना फक्त दुसरा डोस दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांचाही गोंधळ उडाला असून, लस घेण्यासाठी नागरिक केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. परंतु, लस शिल्लक नसल्याने पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांना लस दिली जात नाही. केंद्र सरकारकडून लस प्राप्त झाल्यानंतर ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना लस येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
...
... असे झाले लसीकरण
एकूण लसीकरण- ६१,७८५
१८ ते ४४ वयोगट- ८,८२६
...
४५ वर्षांपुढील - १४,१२५
.....
दररोज ३०० डोस
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना महापालिकेच्या सहा आरोग्य केंद्रांवर लस दिली जात असून, या केंद्रांना दररोज ३०० डोस वितरीत करण्यात येतात. परंतु, ते दुपारपर्यंत संपतात. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडत आहे.