राज्य मोबाइल टॉवर टेक्निकल असोसिएशनने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मोबाइल कंपन्यांची नेटवर्क सेवा सुव्यवस्थित चालवण्यासाठी इंडस टॉवर, एटीसी टेलिकॉम इन्फ्रास्टक्चर कंपनीमार्फत राज्यात ३ ते ४ हजार तांत्रिक कामगार कोरोना योद्ध्याप्रमाणे कर्तव्य बजावत आहेत .
संध्याच्या परिस्थितीमध्ये अखंडित सेवा पुरवण्यासाठी कामगार दिवसरात्र काम करत असून, काही कामगारांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे, तसेच काही कामगार रुग्णालयांत उपचार घेत आहेत. या कामगारांना आरोग्य विमा संरक्षण देण्यात यावे. लॉकडाऊनच्या काळातील शासनाच्या नियम व अटींचे कंपन्यांनी पालन करावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने गेल्या वर्षभरापासून केली जात आहे. असे असताना कामगारांच्या जिवाची पर्वा न करता त्यांच्यावर दडपशाही केली जात असून, मनमानी पद्धतीने काम करून घेत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील विविध टेलिकॉम कंपन्यांमधील सर्व कामगारांनी स्वतःचा व आपल्या परिवाराचा विचार करून घराबाहेर न पडता काम बंद करण्याचा निर्णय घेतल्यास मोबाइल सेवा विस्कळीत होऊ शकते. शासनाने या सर्व परिस्थितीचा विचार करून राज्यातील मोबाइल टॉवर कामगारांच्या प्रश्नामध्ये त्वरित लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी असोसिएशनच्यावतीने सरकारकडे करण्यात आली आहे.