विकसित राष्ट्रनिर्मितीसाठी आंबेडकरांचे विचार प्रेरक
By admin | Published: April 14, 2016 11:59 PM2016-04-14T23:59:55+5:302016-04-15T00:31:06+5:30
अहमदनगर : स्वातंत्र्योत्तर काळात देशाने राज्यघटनेच्या आधारे प्रगती साधली असून विकसित राष्ट्र निर्मितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरक आहेत,
![Ambedkar's thoughts are inspirational for the development of a developed nation | विकसित राष्ट्रनिर्मितीसाठी आंबेडकरांचे विचार प्रेरक Ambedkar's thoughts are inspirational for the development of a developed nation | विकसित राष्ट्रनिर्मितीसाठी आंबेडकरांचे विचार प्रेरक](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/default-image_201704447.jpg)
विकसित राष्ट्रनिर्मितीसाठी आंबेडकरांचे विचार प्रेरक
अहमदनगर : स्वातंत्र्योत्तर काळात देशाने राज्यघटनेच्या आधारे प्रगती साधली असून विकसित राष्ट्र निर्मितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरक आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित सामाजिक समता सप्ताहाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, जि.प.च्या समाजकल्याण सभापती मिराताई चकोर, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती नंदाताई वारे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, समाजकल्याण सहायक आयुक्त माधव वाघ, अशोक गायकवाड डॉ. सुरेश पठारे,समाजकल्याण अधिकारी प्रदिप भोगले उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, देशाची राज्यघटना जगात आदर्शवत आहे. समाजातील वंचित घटकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी घटनेतील तत्वे उपयुक्त आहेत. डॉ. आंबेडकर यांनी घटनेद्वारे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रदान करतांना समाजाला समतेचा संदेश दिला आहे. त्यांचे विचार आणि कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनातर्फे समता आणि सामाजिक न्याय वर्ष साजरे करण्यात आले. बाबासाहेबांच्या विचाराचा आदर्श सर्वदूर पोहचविण्यासाठी लंडन येथील त्यांचे निवासस्थान शासनाने ताब्यात घेतले आहे. त्याठिकाणी स्मारक उभारण्यात येणार आहे. इंदू मिल येथे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील अनेक राज्यघटनांचा अभ्यास करुन त्यातील चांगली तत्वे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली. अध्यक्षा गुंड यांनी सामाजिक न्याय भवनाचे काम सुरु होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी सभापती वारे आणि चकोर यांचीही भाषणे झाली. तहसील कार्यालयातर्फे आर्थिक सहाय्य योजनेच्या धनादेशाचे वितरण आणि भवनाच्या निधीचा धनादेश पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. (प्रतिनिधी)