दोन पावसातच कुकडी आवर्तनाचा विस्तव थंडावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:19 AM2020-06-03T11:19:21+5:302020-06-03T11:19:36+5:30
श्रीगोंदा- कुकडीचे आवर्तन कधी सुटणार आणि शेतीला मिळणार का? यावर चांगलेच रान पेटले होते पण श्रीगोंदा कर्जत पारनेर तालुक्यात दोन पावसाने जोरदार सलामी दिली आणि कुकडीच्या आवर्तनाचा पेटलेला विस्तव थंडावला आहे.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा- कुकडीचे आवर्तन कधी सुटणार आणि शेतीला मिळणार का? यावर चांगलेच रान पेटले होते पण श्रीगोंदा कर्जत पारनेर तालुक्यात दोन पावसाने जोरदार सलामी दिली आणि कुकडीच्या आवर्तनाचा पेटलेला विस्तव थंडावला आहे.
कुकडीचे आवर्तन दि २५ मे सोडणे आवश्यक होते पण डिंबे माणिकडोह चे पाणी येडगाव मध्ये न सोडल्याने कुकडीचे आवर्तन लांबणीवर पडले आणि कुकडीचा लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त झाले माजी मंत्री बबनराव पाचपुते प्रा राम शिंदे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला. दरम्यान काळात राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राहुल जगताप घनश्याम शेलार हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटले नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी लेखी पत्र दिले. अधिक्षक अभियंता हेमंतराव धुमाळ यांनी ६जुनला कुकडी आवर्तनाचा मुहूर्त काढला.
-----------------------
पाणी सुटले तरी सर्व तलावत आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याची शाश्वती नव्हती. अशा त्यामुळे शेतकरी अस्वस्थच होते. १ जुनलाच पावसाने मेघगर्जना करीत सलामी दिली. दोन जुनला रात्री दुसरी फेरी मारली सारी रान अबादानी झाली. घोड लाभक्षेत्र मांडवगण परिसराला दिलासा मिळाला.
आता कुकडीचे आवर्तन कधी सुटणार आणि कशाला देणार यावर चर्चा बंद झाली आहे. शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्याची तयारी सुरु केली आहे.
---
डिंबे माणिकडोह बोगद्याची भिस्त ठाकरे सरकारवर
पावसामुळे कुकडीच्या आवर्तनाचा तात्पुरता विषय संपला आहे मात्र आगामी काळात कुकडीचे पाणी प्रश्न कायम स्वरुपी सोडावयाचा असेल तर डिंबे माणिकडोह बोगदा कुकडी कालव्याचे टेलकडील लाईनिंग कालव्यावरील उपसा सिंचन योजना व हूस पाईपावर आचारसंहिता लागू करणे महत्त्वाचे राहणार आहेत
डिंबे - माणिकडोह बोगद्याला देवेंद्र फडणवीस सरकार प्रशासकीय मान्यता देऊन हिरवा कंदील दाखवला आहे यामध्ये माजी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे पण आता उध्दव ठाकरे यांचे सरकार हे काम कधी हाती घेणार हाच खरा प्रश्न आहे जर हे काम ठाकरे सरकारने हाती घेतली नाही तर यांची किमंत सत्ताधारी गटाला कर्जत करमाळा पारनेर श्रीगोंदा विधानसभा मतदार मोजावी लागणार हे निश्चित आहे
--------------------
श्रीगोंद्यात सरासरी ५८ मिलिमीटर पाऊस
श्रीगोंदा तालुक्यात तीन जुन अखेर सरासरी ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली सर्वाधिक पाऊस बेलवंडी मध्ये ९२ मिलिमीटर तर सर्वात कमी पेडगाव मध्ये २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मांडवगण परिसरातील ८८ मिलिमीटर श्रीगोंदा ५१ काष्टी ७० चिंभळे 51 देवदैठण 47 तर कोळगाव परिसरात 48 मिलिमीटर पाऊस पडला आहे यंदा पावसाची सुरुवात चांगली झाली आहे त्यामुळे पेरणीला वेग येणार आहे.