विनाकारण फिरणाऱ्यांना ५ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:21 AM2021-04-17T04:21:09+5:302021-04-17T04:21:09+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने १४ एप्रिल ते १ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने १४ एप्रिल ते १ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहारांना बंदी आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करत तपासणी सुरू केली आहे. काही ठिकाणी नागरिक विनाकारण नियमांचे उल्लंघन करत घराबाहेर फिरताना आढळून येत आहेत. अशा लोकांची चौकशी करत पोलीस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत. नगर शहरात गुरुवारी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यावर उतरून नियम तोडणाऱ्या विरोधात कारवाई केली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करू नये, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
नियमांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरावर पथकांची स्थापना करण्यात आली असल्याचे जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.