श्रीरामपूर : आयसीआयसीआय बँकेच्या श्रीरामपूर शाखेत मयताच्या खात्यातील ३० लाख रुपयांचा अपहार झाल्याबाबत शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आरोपींमध्ये शाखा व्यवस्थापकांसह बँकेतील अधिकारी, कर्मचा-यांचा समावेश आहे.अमृतलाल चावला यांच्या बँक खात्यात ३० लाख ४० हजार ७०० रुपये जमा होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रवीण यांनी बँकेकडे या रकमेची वारंवार मागणी करूनही त्यांना बँकेकडून रक्कम न मिळता उडवाउडवीची उत्तरे कर्मचा-यांकडून मिळाली. मयत अमृतलाल वृद्ध असल्यामुळे त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार लक्षात त्यांचा मुलगा प्रवीण याच्या लक्षात आला. तो अमेरिकेत असल्याने त्याच्या सुचनेवरून त्यांचे नातेवाईक जितेश मोहन जनवेजा (रा. काझीबाबा रोड, सुभेदारवस्ती, श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी शाखा व्यवस्थापक सचिन बोंबले, अधिकारी विनायक मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रिया अय्यर, राजन व प्राची (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध विश्वासघात करून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. ‘अमृतलाल चावला यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आयसीआयसीआय बँक श्रीरामपूर शाखेतील खात्याविषयी चौकशी केली असता त्यांच्या खात्यातील जमा रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे समजले. अधिक चौकशी केली असता जमा रकमेपैकी काही रक्कम सचिन बोंबले यांच्या आयसीआयसीआय बँकेतील वैयक्तिक खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत शाखाधिका-यांकडे चौकशी केली असता आम्हाला काही सांगता येणार नाही, असे उत्तर देण्यात आले. आरोपी रवी बनकर, विनायक मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रिया अय्यर, राजन, प्राची यांच्याकडून फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटे सांगून पैसे देण्याबाबत अप्रामाणिकपणा दाखवून आपली फसवणूक केली. आरोपींनी इतर बँकेतील रकमाही आयसीआयसीआय बँकेत त्यांच्या खात्यात आणण्यास सांगितले. मयत अमृतलाल चावला हे वृद्ध असल्याचा फायदा घेऊन आरोपींनी वेळोवेळी फसवणूक केली आहे,’ असे फिर्यादीत म्हटले आहे. ही बाब त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा प्रवीण यास जमा रक्कम न मिळाल्यामुळे फसवणूक व अपहार झाल्याचे उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत.