श्रीरामपूर तालुक्यातील झेडपी शाळा झाल्या डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:14+5:302021-07-23T04:14:14+5:30
श्रीरामपूर : जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळांतील मुलांना बालभारतीने विकसित केलेला अभ्यासक्रम लाइव्ह पाहता यावा यासाठी शाळांना ‘एलएफडी’ मॉनिटर ...

श्रीरामपूर तालुक्यातील झेडपी शाळा झाल्या डिजिटल
श्रीरामपूर : जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळांतील मुलांना बालभारतीने विकसित केलेला अभ्यासक्रम लाइव्ह पाहता यावा यासाठी शाळांना ‘एलएफडी’ मॉनिटर देत सर्व सरकारी शाळा डिजिटल करण्याचा प्रकल्प आमदार लहू कानडे यांनी हाती घेतला आहे. अडीच कोटी रुपये खर्च करून १६८ शाळांत ही व्यवस्था करण्यात आली आहे.
शाळांना त्यांच्या पटसंख्येप्रमाणे हे एलएफडी संच देण्यात आले आहेत. मुलांना सर्व विषयांचा अभ्यासक्रम समजावून सांगण्यासाठी बालभारतीने डिजिटल अभ्यासक्रम बनविला आहे. या अभ्यासक्रमामुळे मुलांना आकलन होणे सुलभ जाते. बालभारतीचा हा अभ्यासक्रम एकतर इंंटरनेटच्या आधारे संगणकावर अथवा मोबाइलवर पहावा लागतो. बऱ्याच शाळांमध्ये ही सुविधा नसते. त्यासाठी कानडे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून शाळांना एलएफडी मॉनिटर देण्याचा निर्णय घेतला. या मॉनिटरच्या आधारे टीव्हीप्रमाणे मुलांना वर्गात बालभारतीचे डिजिटल व्हिडिओ पाहता येतील.
श्रीरामपूर मतदारसंघात श्रीरामपूर तालुका व राहुरी तालुक्यातील ३२ गावे समाविष्ट आहेत. हे दोन्ही तालुके मिळून १६८ शाळांत हे संच बसवले आहेत. एकूण ३२० मॉनिटर बसविण्यात आले आहेत. काही शाळांत पटसंख्या अधिक असल्याने तेथे एकापेक्षा अधिक माॅनिटर देण्यात आले. सुमारे १४ हजार मुलांना या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळा एकाच वेळी डिजिटल करण्याचा प्रयोग एखाद्या लोकप्रतिनिधीने बहुधा प्रथमच केल्याचा दावा केला जात आहे.
.............
काय आहे हे तंत्रज्ञान?
एलएफडी अर्थात ‘लार्ज फॉरमॅट डिस्प्ले’ हा एक टीव्हीसारखा मॉनिटर आहे. यावर केवळ बालभारतीचे विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमधील व्हिडिओ मुलांना पाहता येतात. इंटरनेरशिवाय हे व्हिडिओ पाहता येतील. त्यामुळे मुलांना या व्हिडिओच्या माध्यमातून धडे, कविता, अंकगणित, इंग्रजी या सर्व विषयांतील धडे लाइव्ह दाखविता येतात. मुलांना यात बहुपर्यायी प्रश्नही सोडविता येतात. पहिली ते सातवीपर्यंतचा अभ्यासक्रम यात आहे. एलएफडी मॉनिटरचा वापर कसा करावा, यासाठीचे प्रशिक्षणही शिक्षकांना दिले जात आहे.
------
मी स्वत: शिक्षक राहिलो आहे. बालभारतीवरही काम केलेले आहे. त्यामुळे अध्यापन प्रक्रिया सुलभ व विद्यार्थिकेंद्रित व्हावी असा माझा प्रयत्न आहे. गृहपाठाअभावी विद्यार्थी कमी पडतात. त्यामुळे सरकारी शाळांना बळकट करण्यासाठी हा तंत्रस्नेही उपक्रम राबविला जात आहे. मतदारसंघातील सर्व शाळा डिजिटल करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
लहू कानडे, आमदार