जन्मदात्याने पंढरीत फेकले, ओझरच्या विठ्ठलाने तारले
By Admin | Updated: June 29, 2017 16:54 IST2017-06-29T16:52:11+5:302017-06-29T16:54:29+5:30
जन्मत:च नशिबी अंधत्व आल्याने अवघा दोन दिवसांचा असताना जन्मदात्यांनी पंढरपुरात रस्त्याच्या कडेला टाकून दिले़

जन्मदात्याने पंढरीत फेकले, ओझरच्या विठ्ठलाने तारले
आॅनलाइन लोकमत
अहमदनगर : जन्मत:च नशिबी अंधत्व आल्याने अवघा दोन दिवसांचा असताना जन्मदात्यांनी पंढरपुरात रस्त्याच्या कडेला टाकून दिले़ सुदैवाने ओझर येथील शंकर बाबा पापळकर यांच्या आश्रमात पोहोचलो आणि एक नवा जन्म मिळाला़ अनाथालयात बाबांच्या रूपाने पिता अन् मातेचे प्रेम मिळाले़ इतर अनाथ मुले माझी भांवंडे झाली़ आज उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहत आशादायी आयुष्य जगत आहे ते फक्त पापळकर बाबांमुळे़ माझ्यासाठी तर तेच माझी विठूमाऊली आहेत़ अशी भावना विदूर पापळकर या दिव्यांग विद्यार्थ्याने व्यक्त केली़
अमरावती जिल्ह्यातील ओझर येथील स्व़ अंबादासपंत वैद्य मतिमंद बालगृहातील विदूर नगर शहरात स्रेहालय संस्थेला भेट देण्यासाठी आला होता़ स्रेहालयातील काम पाहून प्रभावित झालो़ येणाऱ्या काळात अंध, अपंग, मतिमंदांसाठी आयुष्यभरासाठी काम करणार असल्याचा संकल्प केला असल्याचे विदूर याने ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले़ ओझर गाव परिसरातील जंगलात १९९० रोजी पापळकर बाबांनी अनाथालय सुरू केले़ या आश्रमात आज १२३ अंध, अपंग आणि मतिमंद मुले-मुली आहेत़ विदूर हा त्यांच्यातीलच एक़ आयुष्य जगत असताना अंधत्व कधी अडसर ठरला नाही़ परतवाडा येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता अमरावती येथे बीएसडब्ल्यू च्या अंतिम वर्षात आहे़ करिअर म्हणून अनाथांची सेवा हे क्षेत्र निवडले आहे़ आज अंध, अपंग, अनाथांना शासन विविध संस्थांमध्ये निवारा देते़ वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर मात्र त्यांच्यासाठी काहीच सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत़ या वयात अनेक विद्यार्थी हे स्वत:च्या पायावरही उभे राहिलेले नसतात़ अशा वेळी पुन्हा एकदा त्यांच्या नवीन संघर्षाला प्रारंभ होतो़ पापळकर बाबांच्या अनाथलयात मात्र दाखल झालेल्या अनाथाची पूर्णत: जबाबदारी स्वीकारली जाते़ या आश्रमाच्या माध्यमातून बाबांनी २० मुलींचे लग्न लावून दिले आहेत़ या मुली आज स्वत:च्या पायावर उभे राहून संसार करत आहेत़ बाबांनी वंचितांच्या व्यथा अन् वेदनांवर मायेची फुंकर घालून त्यांना जगण्याचा नवा मंत्र दिला आहे़ मी डोळयाने अंध असलो तरी शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभा राहण्याची हिंमत निर्माण झाली आहे़ माझ्या आयुष्याची सुरूवात अनाथ या शब्दापासून झाली असली तरी आज विदूर शंकरबाबा पापळकर हे नाव माझ्या आयुष्याला जोडले गेले आहे़ ही मोठी संपत्ती असल्याचे विदूर याने सांगितले़